हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०

सांगे बाबांच्या गोष्टी






बाबांचा जन्म मूळतापीचा. घराजवळ  चार पावलांवर तापीतीराचे नयनरम्य सानिध्य ! आजोबांच्या अकाली निधनाने पाठोपाठची भावंडं असणारं ते घर जणू उघडं पडलं.  आजोबा वारले तेव्हा बाबा जवळच्या गावी कामावर  होते. कुणीतरी बातमी दिली तेव्हा सैरभैर झाले आणि रेल्वे स्टेशनवर आले..खिशात पैसे नाही..रस्ता माहित नाही..वाहतुकीची अन्य साधने नाहीत ..आता कसं? ही रेल्वे लाईन आपल्या गावी नक्की जाते हा विश्वास पायातली शक्ती जागवायला पुरेसा ठरला.   गाडीत न चढता हातात एक काठी घेऊन रेल्वे लाईनच्या सोबतीने पदयात्रा सुरु !

अस्तव्यस्त कुटुंब सावरताना पुढे परिस्थितीवशात पडेल ती कामं करत... जमेल तासा टेकू लावत आल्या दिवसांवर मात केली. पण नशीब हुलकावणी देतच राहिलं. जीवन हा ऊन-सावल्यांचा लपंडाव असला तरी या  एकूणच खेळात ऊन्हाचीच साथ-सांगत अधिकांश टिकून राहिली. पुढील जीवनाच्या वाटा आणि वळणांवर नियतीचा नाच म्हणजे फरफट, कुचंबणा, ससेहोलपट आदी शब्द आपली यथार्थता निरंतर पटवीत राहिले. हे भुतावलोकनातून आजही प्रकर्षानं जाणवते .

तत्कालीन लहान गावात मिळकतीची साधने तुटपुंजी ! पर्यायानं आर्थिक चणचण  ही  कायम पाठराखीण होती. पण उमेदीच्या वयाची   रग ,जोम, मानसिक उभारी आला दिवस पार करून देत होती. पुढ्यातल्या स्थितीला हसण्यावारी नेत प्रसंगाचे एकूणच  गांभीर्य निष्प्रभ करण्याची शैली केंद्रस्थानी होती. जीवनचक्राच्या कुरकुरण्यावर विनोदाच्या वंगणाने इलाज होत असे.  अल्पसंतुष्टता आणि ठेविले अनंते...वृत्तीने आर्थिक खिंडारांना लिंपून काढणे सहज अंगवळणी पडले.

बाबांचे घरगुती कामातील कसब अचंबित करणारं होतं. एकामागून एक असा कामाचा फडशा फाडताना , "तू मला सतत काम सांगू शकला नाहीस तर मी तुला खाऊन टाकील !" म्हणणाऱ्या त्या गोष्टीतील जीन नामक राक्षसाची  आठवण झाल्याखेरीज राहत नाही. प्राप्त है वो पर्याप्त है. ही धाटणीमुले चैनीची सुखसाधने आकर्षित करण्यास असमर्थ ठरली. वैयक्तिक आवड-निवडीला नेहमी चार हात दूर राहून साधेपणाचे वैभव प्रस्थापित करण्याची सवय लागली.

"बाबा तुमची जन्मदिनांक काय ?"
"दहा एप्रिल एकोणविसशे तेवीस "
शक्यच नाही..... तुमच्या कुंडली नुसार चार आक्टोबर येते. म्ह्णजे १०-४ नसून ते ४-१० आहे अशी दिवस महिन्याची अदलाबदल झालीय !
आता काय त्याचं, मी जन्मभर तीच तारीख लिहित आलोय, माझं कुठे काय अडलं? अनेकांना केवळ रेकॉर्ड चुकीची झाल्याने जाणीवपूर्वक चुकीची लिहावी लागते. फक्त कुंडलीसाठी खरी हवीय तर असू देत...मला कुंडलीशी काही देणे घेणे नाही. मला काही फरक पडणार नाहीये . तू कशाला नसते उपद्व्याप करतोस?
मी काय बोलणार. इतक्या उशिरा का होईना, खरी तारीख कळली हे काय कमी आहे.

“बाबा, तुम्हाला आत्या होती काय?”
“आत्या? म्हणजे वडिलांना बहिण?? नाही...पण हा विचार तर माझ्या मनात सत्तर वर्षात कधीच आला नाही. तू इतका विचार कशाला करतोस?

“बाबा तुमच्या वडिलांचे नाव नरहरी...त्यांच्या वडिलांचे नाव काय?”
“राजाराम”
“त्यांचे वडील?”
“वामन”
“त्यांचे वडील?” बाबा क्षणभर थबकले...मग हसून म्हणाले “बाजीप्रभू !” त्यांची विनोदबुद्धी अशी टवटवीत होती. पण नंतर म्हणाले – तू विनाकाराण चौकशा आणि उठापटक कशाला करतोस?

बाबांच्या जानव्याला मी लहानपणापासून एक किल्ली लटकलेली बघत असे. एकदा विचारले काय आहे ते म्हणाले.... ही किल्ली आहे तिजोरीची !
तिजोरी कुठे आहे ?
माहित नाही !
तिजोरी नाही.. तर किल्ली कशाला हवीय ?
तिजोरी नाही हे तुला माहित आहे मला माहित आहे पण अनोळखी माणसाला माहित नाही.... तो आपल्याला श्रीमंत समजेल !
यात काय अर्थ आहे उगाच लटकन कशाला हवे ?
हे बघ तिजोरी असली तरी किल्ली नसेल तर त्या तिजोरीला काय अर्थ ? म्हणजे तिजोरी पेक्षा ही किल्ली महत्त्वाची ! आपल्याकडे तिजोरी नसली तरी किल्ली आहे ही मोठी गोष्ट आहे !
उगाच आपलं काहीतरी....... फुकट चोराचा गैरसमज व्हायचा ! फेकून द्या बघू ती किल्ली.....
नाही रे,  आता तुला खरं सांगतो किल्लीच्या वजनाने जानवं सरळ राहते.... हा त्याचा फायदा आहे.

निवृत्ती पश्चात बाबांनी एक नोकरी पत्करली. वेतन वगैरे ठरले नव्हते. पण महिना झाल्यावर जेव्हा त्याने अपेक्षेपेक्षा तुटपुंजी रक्कम देऊ केली तेव्हा ती न स्वीकारता तडक नोकरी सोडून निघून आले.
“नोकरी सोडायचीच होती तर दिले ते घेऊन तरी यायचे....” आईच्या या म्हणण्यावर ते म्हणाले, ‘पण मला त्याच्या मयतीसाठी ते पैसे द्यायचे असतील तर?”   

प्रवास म्हणजे विकतचं  दुखणं ...घरातल्या वस्तू म्हणजे फुकटचं गळ्यात लोढणं का बांधायचं? या वृत्तीने काही जमवलं नाही हे खरं... पण आयुष्य किचकट नं करता सरळसूत राखलं हेही खरंच !  पायजामा आणि बंगाली-शर्ट  या साध्या ठराविक पोशाखात  जगातील कोणतीच स्थित्यंतरे परिवर्तन घडवून आणू शकली नाहीत. पोशाख दोनच....ठेवणीतली जोडी हा दुर्लक्षित विचार होता. आहेत की  दोन पायजामे .आणिक पुन्हा  कशापायी ..एकावर एक घालणार की काय... कुणाच्या लग्नाला जायचय?  असे ठराविक डायलॉग  ऐकावे लागत. पण कपडे रविवारी  स्वच्छ  निळेततून काढलेले असत. इतरांचेही मळकेपण जराही खपत नसे. या स्वभावामुळे एकदा त्यांनी शेजारचे घरमालक नाटी मास्तरचे मळके धोतर त्यांच्या अनुपस्थितीत धुवून पुन्हा त्याचं जागेवर ठेवून दिले. वारंवार लक्षात आणूनही ते मनावर घेत नव्हते...बाबांना मळकेपण  खपत नव्हते...परिणामी  परिणामी ही सहजकृती  केली गेली. गोष्ट लहानशी पण आठवणींच्या गुंतावळीत अडकून राहिलेली..

बाबांचं वाचन फार नव्हतं. केवळ अवलोकन हाच अनुभव ! बांधा मजबूत आणि तब्येतीच्या तक्रारी फार नव्हत्या.... कोलेस्टेरोल, ट्रायग्लिसेराइड्स, लिपीट प्रोफाइल, विटामिन डिफिशियन्सी, हायपर टेन्शन, डायट कंट्रोल असे इंग्रजी शब्द त्यांचे तोंडून कधीच ऐकले नाहीत ! ते त्यांना माहीतच नव्हते आणि त्या वाचून त्यांचं कधी काही अडलं सुद्धा नाही ! पण तेव्हा ते आम्हाला त्यांचं अज्ञान वाटत असे.... पण त्यांची एकंदरीत जीवनशैली ही नैसर्गिक गरजांना साद देणारी होती.... आज सगळ्या शास्त्रांसह परिशिडन करून शेवटी आम्ही बाबांचीच शैली आत्मसात केली आहे.... भूक लागली की जेव्हा वेळ तहान लागली की पाणी प्यावे आणि झोप लागली की झोपावे... शरीर स्वतःच गरजेनुसार मागणी करते..... आपण फार विचार करण्याची गरज नसते !


मला कविमन हे आईकडून आणि विनोदबुद्धी ही बाबांकडून मिळालीय. त्यांचे जीवन तत्वज्ञान कुठल्याही पुस्तकातून आलेले नव्हते. स्वतःच्या चिंतनातून तर मुळीच आलेले नव्हते. जे होते ते अस्सल उपजत होते. पर्यायाने त्याची फारशी जाणीव पण नव्हती.  " नो-वरी कीट " त्यांच्यात इनबिल्ट होती, असं आम्ही गमतीनं म्हणत असू. तणावपूर्ण प्रसंग हसण्यावारी नेण्याची कला हे त्या कीट चे प्रात्यक्षिक वरदान होते.

बाबांचे छंद जरा विचित्र होते. ओळखीचं जाळे विणण्याचा छंद.  थोड्याथोडक्या ओळखीतही कुणाच्याही घरी  किंवा त्याच्या कार्यालयात भेट देणे...त्या बोलण्यातून कुणा दुसऱ्याचा  पत्ता मिळाला की तेथे जावून पहिल्याची ओळख सांगायची....अश्शी गम्मत ! अनेक पेन जमा केले होते पण ते जुने टाकावू असल्याने त्यांना एन्टीक मूल्य नव्हते पण फावल्या वेळात एका पेनाला दुसर्याचे टोकर एकाची निभ आणि जीभ  दुसऱ्याला  जुळवत “ आता बघ मस्तपैकी फौंटनपेन तय्यार ! असे तयार करून एखाद्या शाळेसमोर जावून पोरांना मी हे पेन विकणार !”
“कुणीसुद्धा घेणार नाहीत..तुमचे ते फडतूस पेन ?”
“नाही घेतले तर मी  फुकट वाटील !”
बरच झालं हल्लीचा युज एंड थ्रो पेन चा जमाना त्यांनी पाहिला नाही. तो प्रकार त्यांना अजिबात आवडला नसता. पेन एकदा वापरून झाला की फेकून देणे म्हणजे काय?

घरगुती कामातील कसब वाखाणण्याजोगं होतं. निवडणे, शिवणे, कपडे धुणे हे आवडते कामं. आताघरी कधी  जेव्हा सुतळी, खिळे, नाडे, वाशर, छोट्या बाटल्या, दोरे, दाभण, पोकर, शर्टच्या बटन्स यांची गरज भासते तेव्हातेव्हा बाबांच्या या वस्तूंच्या निगुतीनं केलेल्या  कलेक्शनची हमखास आठवण आल्याखेरीज राहत नाही. साबणाचे रेपर जमा करून ठेवायचे..बघ किती सुंदर चित्र....वस्तू सोबत रेपर्चेही पैसे आपण मोजले असतात...तुम्हा लोकांना पैशाची किंमतच नाही. आता यावर हसावे की राडावे ते कळेनासे होई.

बाबांना उधारीची सवय होती आणि तेच त्यांच्या निरंतर गरिबीचं कारण होतं असं माझं ठाम मत आहे. त्यामागे ते अजब तर्कट ऐकवीत. महिनाभर राजा सारखं राहावं  माणसांनी आणि एक तारखेला देणी देऊन कफल्लक वाटले तरी हरकत नाही. अयथा उलट व्हायचं एक तारखेला राजा दानशूर कर्ण आणि महिनाभर विदुराच्या कण्या... माझ्यातील ऋण-द्वेषाचे कारण उधारीचे दाहक वास्तव हेच आहे. उधारी म्हणजे मजबुरी....नंतर आले तरी आधी नगदी वाल्यांची वास्तपुस्त...तोवर उधारी वाल्यांना उभे ठेवले जाते...निकृष्ट माल उधारीच्या माथी येतो. सगळा पगार उधारी पटविण्यात गेल्यावर पैशाविना होणारी कुचंबणा, कोंडमारा, जीवाची घालमेल आदीमुळे  गरिबीचा अगदी जवळून अभ्यास झाला. "दारिद्र्य परमान्जानम" असं वचनाच आहे. " गरिबीत जन्म झालं असला तर माझा दोष नाही पण किमान गरिबीत मारणार नाही" असं कुठेतरी वाचलं होतं. या वाक्याचा मनावर खोलवर परिणाम झाला. नंतर तुटपुंजी मिळकत असली तरी कसंही  करून स्वतःच्या घरासाठी बचतीचा आटोकाट प्रयत्न करणे...हेच काय ते हाती उरलं !   

एकदा बाबांचा पगाराचा खिसा कापल्या गेला. ही घटना फार मोठी नसली तर गम्मत पुढे आहे. त्या दिवशी आम्हा सर्वांना कळले की  बाबांजवळ शिलकेत एक पै नाही...कुठल्याही बँकेत खाते नाही.
“म्हणजे तुमचे बँकेत बचत खाते नाहीच का?” कुणीतरी विचारले
“अख्खा पगार त्याच दिवशी उधारी चुकवण्यात जातो तर खात्यात बचत कशी करणार?” असल्या या  युक्तीवादावर फक्त आईचं  समाधान होई. कारण तिनेही आर्थिक चणचणीचा मनाने स्वीकार केला होता. पण मला मात्र त्यात धोरणीपणाचा अभाव दिसायचा.

आनंद भंडारची मिक्स मिठाई, नंद भंडारची रबडी, पेढे, गुळ-पापडी, आंबे, डांगूर असे गोड पदार्थ फार आवडायचे. बाबांना मधुमेह कधीच नव्हता. जो होता तो पॉपिन्स आणि पेढ्यांच्या अतिरेकी सेवनाचा उद्रेक होता. खिशात रोज  पेढ्यांचा पुडा, हे एक लक्षणीय वैशिष्ट ! लोक म्हणत काही आनंदाचा प्रसंग झाला तर आपण पेढे आणतो..तुम्हाला रोज इतका कोणता आनंद होतो?

रिस्टवाच आणि रेन-कोट या मामुली वस्तूंचे जबर आकर्षण होते. पण त्यांनी या दोन गोष्टी कधीच विकत घेतल्या नाहीत. बाबा घड्याळ का नाही तुमच्या हाताला? या प्रश्नावर ते म्हाणाले.,” अरे त्या लक्ष्मी-नारायण कॉलेजवर इतकं मोठं LIT घड्याळ कशासाठी लावून ठेवलंय?”

काही लोकांच्या सदसुखीपानांच रहस्य मला वाटतं त्यांच्या विस्मरणशीलतेला द्यावे लागेल. पण तो दोष म्हणून नव्हे तर वरदान म्हणूया ! कारण अल्पावधीत डिलीट ऑल करून संपूर्ण पाटी कोरी ठेवायची. परिणाम इ कधीकधी तीच चूक पुन्हापुन्हा नव्याने बिनदिक्कत करायची सोय...घरी सामोसा केला की  आकार बिघडतो हे कळले पण तरी पुन्हा नव्या उत्साहाने सामोस्याचा घाट घालायचा. बाबा चिंता न करणे तुम्हाला कसे जमते हो?

चिंता म्हणजे का? आता काय खाली डोके आणि वर पाय करू? “चिंता से चतुराई घटे- दुख से घटे शरीर...पाप से लक्ष्मी घटे – कह गये दास कबीर” हा कबीराचा दोहा तशीच वेळ येताच दर वेळी वर्षानुवर्षे तसाच रिपीट करणार. हे इवलेसे तत्वज्ञान पुरेसे असते. उदा. अंघोळ मला आधी करू दे. माझी चिमणीची अंघोळ आहे. तासभर नाही लागत. चिमणीची अंघोळ हा वाक्प्रचार असा काही  फीट –फीड असतो की  आपोआप तोंडावाटे पडतो.

एकदा मंदिरात बाबा काहीतरी वाचत होते. मुळात चष्म्याची गरज नव्हती. पण तेथील एका अतिहुशार म्हाताऱ्याने “चष्मा लगाके पढो” असं स्वानुभवाचा फुकट अनाहूत सल्ला दिला. त्यामुळे त्यांनी कुतूहलापोटी चाळीशीचा चष्मा विकत घेतला. पण मुळात त्याची गरजच नसल्याने “मला बिना चष्म्यानीच जास्त चांगलं दिसते !” असा निष्कर्ष काढला. ती एक पडीत वस्तू झाली. त्यामुळे ८७व्या वर्षीही ते चष्मा न लावता वृत्तपत्र वाचन करीत. कधी फोटो काढताना उगाच शोभेची वस्तू म्हणून चष्मा लावून बसत.

त्यांच्या वयाच्या मंडळींसोबत कधी विचारमंथन गप्पा करताना दिसत नसत. लहान मुलांसोबत विशेष रमायचे. लहानंसोबत लहान होऊन वागताना आपले चालू वय विसरायला होत असावे. एकदा मनी रडत म्हणाली, “आजोबांना पेपरमिंट फोडून मागितली तर मला लहान तुकडा दिला...मोठा स्वतः खाऊन टाकला. नाही मी मोठा नाही घेतला असं म्हणताना अगदी लहान बालकासारखे दिसले. 
आजोबा तुमचं नाव काय?
बाळकृष्ण..... पण आता प्रौढकृष्ण म्हणाला काही हरकत नाही 
आजोबा तुम्ही लहानपणी कसे होतात? छोट्या मनीच्या या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं ,” गोरापान, गुटगुटीत फर्स्ट-क्लास !”

“बाबा तुम्हाला नोकरी लागली, तेव्हा मुलाखत आणि निवड कशी झाली, ती गम्मत सांगा ना!”
“आम्ही ओळीने बसलो होतो. एकेकाला आत सोडत होते. मि गेलो तेव्हा तेथे एक गोरा इंग्रज बसला होता. मला बघताच म्हाणाला – tallman selected ! झाला...संपला इंटर-व्ह्यू !

बाबांनी चिंता कधी केली नाही आणि ते दीर्घायुषी झाले. त्यांची चिंता अनेकांनी केली...पण ते आज जिवंत आहेत काय? ते तर कधीचेच मेले हो...चिंतेने ! या चिंतामुक्ती वर बाबा मौलिक बौद्धिक ऐका “होणा है सो होना है – फिर काहे का रोना है.. समोर आव्हान आल्यास फाईट, फ्राईट आणि फ्लाईट यातील तिसरा मार्ग सोयीचा वाटे. समस्येकडे कानाडोळा करत अन्नुल्लेखाने फुग्यातील हवाच्च काढून घेण्याचे दुर्मिळ कसब त्यांनी कमावलेले नव्हते तर ती  दैवी देणगी होती. ही सुद्धा फुशारकीची  बाब होऊ शकते हे ध्यानीमनी नसे. कोणत्याही कामाला कमी न लेखता नेटकेपणा व अंगभूत हलकाईने कार्यरत राहून वैफल्याला कदापि जवळ फटकू दिले नाही. परिणामी नैराश्याला आल्यापावली तोंड काळे करण्या उपर गत्यंतर नसे.

“मनुष्याला दोनच चिंता असू शकतात...जेवल मिळाले  पाहिजे आणि शौचास साफ व्हायला हवी. म्हणजे आत जायला हवे ते आत गेले पाहिजे आणि बाहेर यायला हवे ते बाहेर आले पाहिजे तेही योग्यवेळी मग इतके झाल्यावर कशाची चिंता उरते ? loading आणि unloading ठीकठाक सुरु राहिलं तर दळणवळण म्हणजे ट्रकचा धंदा चांगला चाललाय असं खुशाल समजायला हरकत नाही. खायला आणि औषधाला पेन्शन आहे...शंभरी गाठायला काय हरकत आहे?

एक सर्वश्रुत कहाणी आहे. झाडाखाली आराम करणाऱ्याला एक विद्वान सुनावतो. तुमच्यासारखे लोक आहेत म्हणून देशाची प्रगती होत नाही. अरे काही काम कर...मग काय होईल? पैसे मिळतील...मग काय होईल ..ते गुंतवून मोठं धंदा उभारशील ...मग काय होईल? शेवटी विद्वान म्हणतो मग तू आरामात जगू शकशील. ते तर मी आत्ताच करतोय की ! सदर कथेतील ती आरामशीर व्यक्ती म्हणजे बाबा असावेत...असं नेहमी वाटतं. असो हा झाला गमतीचा भाग.

स्वतःचे घर या विचाराला आर्थिक स्थितीने कधीच उमेदीच्या दिवसात परवानगी दिली नाही. पण कुठे घरबांधणी सुरु असल्या मुद्दाम थांबून ते दृश्य बघायला आवडे.
“बघ तो एव्हडा खर्च आणि त्रास करून घर बांधतोय बिचारा...आपल्याला मोफत आयते बघायला काय जाते?”
“अहो, पण दुसऱ्यांचे घर बघणे  आणि स्वतःचे घर बांधणे यात फरक नाही का?”
“तो काय घेवून जाणार आहे की काय घर घर सोबत मेल्यावर ! घर ही निव्वळ तात्पुरती व्यवस्था असते रे !” अलौकिक पातळीवर हे शब्द खरे उतरत असले तरी लौकिक समाधान करणारे नव्हते.

आमच्या लहानपणी घरापुढे एक श्रीमंताचा बंगला होतां. त्यांचे ते लक्ष्मीपुत्र वारेमाप फटाके दिवाळीत फोडायचे. ते बघून अस्मादिकांचे बालमन फाताक्यासाठी हट्ट करी. तेव्हा बाबा समजवायचे, “ अरे त्यांना जेवढा फटाक्याचा आवाज मिळतोय ना तेवढाच आपल्यालाही मोफत मिळतोय...याउपर त्यांना वात पेटवावी लागतेय...वात पेटवण्यात कोणता आनंद?

बाबांच्या बालसुलभ वयात कधीतरी सायकल शिकताना टी थेट एका बांगडीवालीच्या दुकानात घुसली होती म्हणे...तिने आकांडतांडव केलं ...अजोबा भडकले, “खबरदार, पुन्हा सायकलला हात लावशील तर !” या ब्रम्हवाक्याचे कठोर पालन म्हणून उभ्या आयुष्यात कधीच सायकल किंवा तत्सम वाहन चालवले नाही. कचेरीतून बरेचदा पायी येताना बघून  कुणी बसने येण्याचा सल्ला देताच म्हणायचे, “ पायी येण्याचा त्रास बघू नका...आजवर बसचे किती पैसे वाचवले ते बघा!” पण हे गमतीने बोलण्यापुरते होते, खिशातल्या पेपरमिंट गोळ्या मैलोनगणती पायपिटी साठी बळ देत राहिल्या...हे सत्य मागे उरतंच !

कधीही बँकेत खाते न  उघडणारा हा अपवादात्मक माणूस !” उधारीचा अनुशेषच पुरा होत नाहीये – बँकेत काय डोमलं ठेवणार?” हा युक्तिवाद ! मासाराम्भीच उधारीचे हप्ते भागवल्यावर मग काय...पुढे महिनाभर गरिबीचा जवळून अभ्यास करायला मोकळे ! गरिबीची टिंगल उडवीत जगणे सोपे नाही. मला फर्निचर, सोफा-कम बेड घ्यायचाय पण घरी जागाच नाही म्हणून राहिलाय..इथे नाकपुडीत हरिकीर्तन आणि आपणा चार पाव का हाथी तीन पाव पे खडा है. अपनी धीमी गती कि गाडी है बस यु ही चलती राही तो इक दिन मंझील पार कर लेंगे. जिस हालात राखे भगवान अलमस्त रहो भरपूर सदा –यातून जीवनदृष्टी प्रकट होई. चैनीची सुखसाधने त्यांना आकर्षित करण्यास असमर्थ ठरली होती. फुटकळ खर्चाच्या सुवाच्य नोंदी टिपून ठेवीत. पण जीवनाच्या मोठ्या अर्थश्स्त्राबाबत कमालीचा बेहिशेबीपणा अंगात भिनला होता. रीत्भातीचे धोरण सैल असले तरी गुनिन्च्या कौतुकासाठी शब्दात काटकसर कुचराई केली नाही.

आल्यागेल्यांच्या सहाणेवर आपले दुःखाचे चंदन उगाळीत बसण्याचा फोलपणा आधीपासूनच उमगला होता. या जगतात लौकिकार्थाने यशस्वी म्हणून गणण्यासाठी जे व्यवहार-चातुर्य असावे लागते त्याच्याशीच कायम फारकत घेतल्याने “पत” वगैरे शब्दांशी जवळीक साधता आली नाही. एकसुरी निरंतरतेने  उन्नतीचा आलेख मांडण्याच्या कामातून सुटका झाली होती एव्हढेच.

आयुष्यात संधीने दार ठोठावले नाही हे खरे आहे ...तसेच यांनीही कधी संधीची वाट बघितली नाही हेही तितकेच खरे आहे. कुठेतरी काद्माडून श्रेय लाटण्याशी त्यांचा दुरान्वयानेही संबंध नव्हता. नेहमी शेवटच्या फळीतील रिकाम्या आसनावरील आपला हक्क अबाधित ठेवला होता. वखवखशून्य आयुष्य हवे तर असेच समाधानाच्या खुंटीला घट्ट धरूण ठेवावे लागते बरं !

चिंतन केले नाही तशी चिंताही केली नाही. आल्या दिवसाचे हसतमुखाने स्वागत केले. भूतकालीन सिंहावालोकानाची गरज भासली नाही तसे भविष्याचे नियोजनही साधले नाही. असे सदा वर्तमानात राहणे एकाअर्थी अव्यक्त ईश्वरशरणताच नव्हे काय?

मी मेट्रिकला असताना ट्युशन लावायचं म्हणालो. पण बाबा नेहमीप्रमाणे म्हणाले काही नको पैसे नाहीत !
नंतर थोड्या वेळाने मला बोलावून म्हणाले, “ तू जा ट्युशनला- मी देईन पैसे !” या दरम्यान त्यांनी काहीच विचार केलं नसेल असं कसं म्हणता येईल?

एव्हडे मात्र खरे की उच्चभ्रू आढ्यतेच्या प्रथितयश वलयापासून ते सुरक्षित अंतर राखून होते. जवळीक होती ती निर्व्याज हलक्या-फुलक्या गप्पा छाटणाऱ्या साध्या-सुध्या जीवन्यात्रीशी...लहान बालकांशी ! क्रोध नाकावर नव्हता..उशिरा येत असे आणि लवकर मावळत असे. पाच मिनिटाच्या राग...नंतर त्याचा मागमूस उरत नसे.

आजारपण म्हणाल तर औषधालाही नव्हते. एकदा माझं डोकं दुखत होतं .बाबा साधेपणाने बोलून जायचे म्हणाले “असं कसं डोकं दुखते? आमचं  तर कधी दुखत नाही..जेवण झालं...झोप झाली..शौचास झाली आल तब्येत बिघडायला काय झालं?”
“तुमचे डोके दुखेल तेव्हा समजेल !” असं मी वैतागाने म्हणे. पण दैवी योजना अशी तशी वेळ आलीच नाही त्यांचे डोके कधी दुखलेच नाही. बाह्य संसर्ग, तणाव यामुळे अस्वस्थता येऊ शकते हे त्यांच्या गावीही नव्हते. मला अर्धशिशीचा त्रास म्हणून गालिबच्या भाषेत जरा फेरबदल करून म्हाणावेसे वाटते.... इस तबियतने मुझे निकम्मा कर दिया...वरना हम भी आदमी थे काम के....असो.

एकदा सकाळपासून बाबा अस्वस्थ दिसले. जीव बेचैन आणि चेहरा घाबरा-घुबरा झाला. मी ऑफिसमध्ये होतो. त्यांनी मला बोलावून घेतले. “येये माझ्याजवळ बस..माझी तब्येत बरी नाही” ” क्षीण आणि हळू आवाजात बोलू लागले. मी अधिकच गंभीर होऊन ऐकू लागलो.
“तू मोठा मुलगा आहेस म्हणून तुझा अधिकार वेगळा...” मला भलामोठा पोरवडा असलेले पिताश्री आठवले.
“मी आता जातोय..सगळं सुखासुखी व्हावं...माझ्या जवळ काही संपत्ती नाही...” बाबा आढ्याकडे बघत बोलत होते. संपत्ती नाही हे एखाद्याने संपत्तीचं गुपित उघड करावं तसं त्यांनी सांगितलं...याचं  मला त्याहीवेळी हसू आलं.
काय होतंय ते तरी सांगाल की नाही?
‘आज सकाळी खुलाशेवार शौचास झाली नाही !” मी कपाळावर हात मारून घेतला. त्यानंतर बाबा चक्क तीस वर्षे जगले.

नोकरीत कधी कटकट वाटली तर, डॉयलॉग ठरलेला, “या हाजीहाजीपेक्षा आता ठोक मार्केट मध्ये कांदे बटाटे पोत्याने घ्यायचे आणि तेथेच चिल्लर विक्रीला बसायचं. संध्याकाळी खुर्दा घेऊन घरी...अर्थात हे कुणाचे तरी ऐकीव बोल होते...जे प्रत्यक्षात उतरवण्यचा वकूब यांच्यात जराही नव्हता.

जेवणातही आवडनिवड कोसो दूर...पोटात भूक असली की सगळं आवडतं हा खाक्या. आंब्याचा रस हा दुर्बलबिंदू आय मीन विक-पोइंट...मग सुरु होई अतिरंजित कथा... टाकीभर आंब्याचा रस करण्याची गोष्ट नेहमी सांगत.आमच्याकडे आमराई होती. आंब्याचा माच आटाळ्यावर असे मी तेथे जाऊन मनसोक्त आंबे खायचा. एका मोठ्या टाकीत आंब्याचा रस मी करायचा..खावून उरलेल्या रसाच्या टाकीत आम्ही पोहत असू..” आदी अतिशयोक्त वर्णने बहु ऐकली आहेत.

कोऱ्या करकरीत नोटेचे विशेष आकर्षण ! इतके की वीस रुपयाच्या मळकट नोटेच्या बदल्यात दहाची नवी नोट सहर्ष स्वीकारतील ! जुनी नोट चालवत नाही तोवर जीवाला चैन नसे !

फावल्या वेळात जुन्या कापडाच्या चिंध्या जोडून गोधडी शिवण्याचा एक छंद होता. सातत्याने ते काम करताना बघुन्मी एकदा उद्वेगाने म्हणालो, “ उगाच चिंध्या सावडत बसता....फेका त्या चिंध्या !”
बाबा उतरले, “ मी चिंध्या सावडतो...तू कागदाचे चिठोरे सावडतो ...तुझे चिठोरे फेकले तर कसं वाटेल तुला?” या प्रतिप्रश्नावर मी निरुत्तर झालो....त्याहून अधिक अंतर्मुखही !! खरंच माझ्या चीठोऱ्याना त्यांच्या लेखी चिंध्या पेक्षा जास्त अर्थ नव्हताच !!

वेळेशी काय खायचे हा प्रश्न कधी सतावला नाही. हालचालीवर निर्बंध आले होते तरी खिडकीतून  रस्त्यावरच्या जाणाऱ्या-येणाऱ्या गाड्या मोजणे सुरु असायचे. इकडून २५ गाड्या गेल्या की मी जेवायला बसतो. सांगा तणाव कसा बरं येणार? फक्त पोझीटीव बघून सुखी व्हावं...तुम्ही निगेटिव बघून दुःखी का होता? हा त्यांचा रोकडा सवाल? भाजप निवडून आली तेव्हा म्हणाले,” आता अडवानी पंतप्रधान होणार” पण ते झाले नाहीत म्हणून धक्का बसण्याचे कारण नाही.” कदाचित १ वर्षासाठी नंतर करतील त्यांना कारण आता त्याचाच तर नंबर आहे !” अशी स्वानुकुल समजूत करून सुखी होत असत.

घरी टीव्ही येणे ही एक क्रांतिकारी घटना...वाटलं बाबांना खूप आनंद होईल. टीव्हीचे आगमन झाले तेव्हा बाबा जेवत होते. त्यांना सांगितलं  तर, “ मी आत्ताच जेवायला बसलोय...कशाची घाई आहे?” मी अशावेळी जेवण सोडून उठलो असतो. पण जेवताना मध्येच कसे उठणार? ते शांतपणे जेवण आटोपून, चुळा भरून हात धुवून, पंचाला पुसत आरामात आले.
“बाबा, तुम्हाला आनंद नाही..उत्साह नाही?”
“तू एक टी.व्ही. गळ्यात बांधून घे !”
नंतर एकदा म्हणाले, तुला इतकी माहिती काढावी लागते, पैसे मोजावे लागतात, देखभाल काळजी करावी लागते. मला मात्र आरामात बसून सर्व बघायला मिळते. हा हा हा  आधी आजची बातमी उद्या पेपरला यायची...आता आजची बातमी थोड्याच वेळात प्रत्यक्ष चालत्या-बोलत्या फोटोसकट बघायला मिळते..जगातल्या घडामोडी घरबसल्या बघायला मिळतात तर कशाला बाहेर भटकायचे. ही जाणीव थक्क करणारी होती. हल्ली कमरेत वाक आल्याने वाकरशी दोस्ती डेली होती. हिंद्न्यावर मर्यादा आली तरी खिडकीतून जग बघता येतं हे समाधान पुरेसं होतं.

विंचवाच्या बिऱ्हाडा प्रमाणे किरायाची घरे बदलावी लागत. एका रिक्षात भांड्याचे पोते..वरून दोन पलंग लावले की सामन शिफ्ट ! पंप्रत्येक घरात दरवाज्याच्या मागे एक काठी असायची. आम्ही तिला गुढीची काठी म्हणायचो. बाबा सांगत ती गुढीची काठी गुढीपाडव्याला एक दिवस पण बाकी दिवस ती आपले रक्षण करते. रात्री कुणी दरोडेखोर आले तर अ आपल्या जवळ काही हवे की नाही?

“पण बाबा, दरोडेखोर आपल्या घरी यायला मूर्ख आहेत की काय?” यावर ते काही बोलले नाही पण त्या काठीमुळे आपण बिनघोर झोपू शकतो यावर त्यांचां ठाम विश्व्वास होता.

कधी कुणी कारमधून घरापर्यंत सोडून दिलं तर तेवढं  सुख स्वतःच्या भाग्याचा गर्व करायला पुरेसं ठरायचं. दुःखाची गोळी गिळून टाकायची असते आणि सुखाची गोळी ही चघळायची असते. दुःखाला दाबून लहान करून टाकायचं आणि सुखाच्या फुग्यात हवा भरून त्याला मोठं करायचं.
“बाबा, कृतार्थता वाटेल अशी कोणती गोष्ट तुम्हाला वाटते?”
“माणूस रिटायर्ड होतो त्यादिवशी ज्याची तब्येत उत्तम तो जिंकला....मी तर जेव्हडी वर्षे सर्विस केली त्याहून अधिक वर्षे पेन्शन घेतली...हे आयुष्यातले सर्वात मोठे सुख !”
१ तारीख आली की सकाळपासून पेन्शनची लगबग...दाढी करून गोगल लावून तय्यार ! यावर स्पष्टीकरण देताना सांगत...दाढी वाढली असेल तर उगाच तब्येतीची विचारपूस करतात. त्यांना एकदा एकाने विचारले, “क्या तुम्हे मौत से डर  नाही लगता?”
“बिलकुल नही...मगर इक दिन जाना  रे भाई....तबतक जियो जी भरके !”
“तुम्हाला डायबेटीस आहे का?”
“कोण म्हणताय...अजिबात नाही डायबेटीस होगा मेरी दुष्मनको ...काही लोक जेवण करण्याच्या ऐवजी चिंता करतात म्हणू त्यांना व्याधी जडतात. डायबेटीस म्हणूस इतके जेवणाचे नियम पाळतात की त्यांचे पोषणाच होत नाही...मग मरणाची तयारी होते !”

देवाशी संबंध त्रोटकच ...नमस्कारा पुरता...चमत्कारासाठी नव्हे....त्यामुळे देवाकडे मागणे नव्हते...अपेक्षा नव्हत्या..नशीब या पारंपारिक संकल्पनेला छेद देऊन प्राप्त जीवन संघर्षाशी त्यांचा उभा दावा होता. आरामाशी मात्र अकारण शत्रुता बाळगली होती. परमार्थ फारसा वाचला नाही. पण परमार्थ जगले तेही नकळत ! निचंतपणा बघून इतरांना हेवा वाटावा. जो ज्ञानी योग्यानाही चिंतेला बगल देणे प्रयत्नांती साधत नाही. कुणाकडून अपेक्षा नाही तशी कुणाविरुद्ध तक्रार नाही. नियातीच्या अस्तित्वाची जाणीवच नव्हती...मग नियातील्ला क्रूर वगैरे म्हणणे दूरच ! दैवाच्या दिरंगाईळा सहनशीलतेने प्रत्युत्तर देत जीवननौका पार करून नेली. व्यवहारातील चलनी नाणे कोणते याची कधी पत्रास बाळगली नाही. व्युहरचना खटपट लटपट मानवत नव्हती. तदनुषंगाने प्राप्त पिछ्डीची मुर्वत बाळगली नाही. अभिनय आणि की अभिनिवेश नाही...म्हणूनच कदाचित मातीत मळणाऱ्या या जन्माची खंतही उरात उरली नव्हती. बाबांचे अस्थी-विसर्जन त्यांच्या जन्मगावी मुल्ताईला  झाले. तेव्हा अस्थिकलश  घेऊन गाडी करून मुल्ताई कडे जाताना बाबांची आठवण झाली. जिवंतपणी का कधी गाडी करून मुल्ताईला  त्यांना घेऊन जाणे सुचले नाही....? 

असो. दीर्घायुष्य पार पडले...कापुरासारखे जगणे झाले...शेष काही न उरले...उरले केवळ खुमासदार किस्से !
   


मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०१९

माझं माझं




"हे आत्मचरित्र नाही..."
" तर मग काय आहे यात ? "
"एक अतीसामान्य जीवनपट ! फार काही सांगण्याजोगं भव्यदिव्य नसताना ही अनाधिकार चेष्टा का ?
असं  विचाराल तर, निव्वळ एक मनस्वी आत्मनिवेदन मांडणे - हे असेल माझं या प्रश्नाला  उत्तर !

"स्वयं के बारेमे मै केवल इतना जानता हू....की मै कुछ नहीं जानता !" सुकरातचे हे वचन दिशादर्शक ठरलं...आणि वेळोवेळी स्फुरलेल्या चिंतकांचा इथं नकळत डोंगर उभा झाला. वाचताना वेचलेलं...काहीसं तात्विक... जरासं काव्यात्म...थोडसं मनातलं...बरचसं सभोवतालचं असं सारं  या गोष्टींच्या  शिंक्यात समाविष्ट करत गेलो...एवढंच !

My lafe & times असली वजनी वाहतूक कशापायी? कुछ  हटके, कुछ तुफानी, life clippings, गागरमे सागर असं वाचकांना भावतं. हे.निव्वळ शब्द बुडबुडे नाहीत... जाणीव नेणीवेचे पुतळे आहेत. हा सूत्रबद्ध नियमित घटनाक्रम नाही... अनियमित जीवनानुभवांची रोजनिशी आहे. एक ऊर्ध्वगामी भविष्यवेधी चिंतन ज्याची दिशा ही आतापावेतो गाठलेल्या टप्प्यापासून पुढे नेणारी असेल. जगजीवनात "आणखी कायकाय" हे हुडकताना  ते मला "आणखी कसंकसं" दिसलं ते सारं या पोतडीत आहे. याहून आणखी नेमकं काय विचाराल तर ते मलाही सांगता यायचं नाही. ते आपणच आपलं ठरवणं बरं नाही का होणार?

"जीवेत  शरदः शतं " या वेद-वचनावर निष्ठा राखून  सुरु केलेली एक  new inning....शरीर-मन स्वस्थ ठेवण्यासाठी हे माझ्या पुरतं - आर्ट ऑफ लिव्हिंग  ! सामान्य माणसाला यात स्वतःचं प्रतिबिंब दिसलं  तरी या खटाटोपाचं  सार्थक झालंय, असं मी निर्विवाद  समजेन ! आजवर माझं अनुभव-विश्व ...भावविश्व ज्यांनी समृद्ध केलाय त्या तमाम व्यक्त-अव्यक्त संसाधकांना आणि संसाधनांना  सविनय अभिवादन ! माझ्या कलमगिरीने जी मने प्रभावित झाली...त्या समस्त अनाम वाचकांना ही साहित्यकृती  समर्पित !!

मी एक  तत्वज्ञ

समजायला लागल्यापासून.... नंतर अक्षरओळख झाल्यापासून माझी प्रत्येक कृती ही तात्विक पातळीवरून होत गेल्याचे जाणवते.  याअर्थी  मी स्वयंघोषित तत्वज्ञ आहे.....  आणि यामुळे  कुणाला काही त्रास  त्रास नसल्यानं  , अन्य काही आक्षेप, उजर  असण्याचं  कारण नाही.

कोणतीही एखादी कला अंगभूत असल्यास तो जात्याच कलाकार ठरतो. त्याप्रमाणे तत्वज्ञ philosopher हा सुद्धा जात्याच म्हणजे जन्मसिद्ध असू शकतो. अशा स्थितीत आणिक कोणत्या विद्यापीठाकडून अभ्यासक्रम पार पाडल्याचे प्रमाणपत्र  घेण्याची काय गरज?

कधी कुणी तत्वज्ञान विषय घेऊन पदवी  मिळवतात. पुढे त्या विषयाचे अध्यापक प्राध्यापक वगैरे होतात. पण याचा अर्थ ते तत्वज्ञ आहेत ...असा मुळीच होत नाही.. तत्वज्ञानाचा क्रमिक पाठ्यक्रम फारसा न वाचताही  जो सातत्यानं निव्वळ तत्वज्ञानाच्या भूमिकेतून जगतो...विचार करतो...जगाला पाहतो...तो खरा तत्वज्ञ जाणावा.

मुळात माझा पिंड कालाशाखेशी मेळ राखणारा...पण तेव्हा विज्ञान शाखेची निवड ही हुशार विद्यार्थाची खूण ! झालं.....जुनिअर कॉलेजला  विज्ञान घेतले पण तेथे मन रमेना म्हणून त्यानंतरचा पर्याय वाणिज्य शाखा. मी वाणिज्य शाखेत पदवीधर आणि तत्सम नोकरीक्षेत्र ! पण कला साहित्य नाट्य  काव्याची आवड जोपासण्यासाठी गत अनेक वर्षांपासून कला आणि सांस्कृतिक क्षेत्राशी जुळलेलो आहे. कारण तीच माझी अभिजात रुची आहे.

पोटार्थी बुद्धीची कास धरून जरी मी वाणिज्य शाखेचा अभ्यासक्रम निवडला तरी मूळ पिंड तत्वज्ञानाचा असल्या कारणानं मला तत्वज्ञ होण्यापासून कुणी रोखू शकत नाही. तेव्हा मी born philosopher आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो. Myself  keeping proud  of it !

नळाचं काम करणारा स्वतःला प्लंबर म्हणवतो, घरबांधणी जुडाई  करणारा स्वतःला गवंडी संबोधतो...लाकडी काम करणारा स्वतःची ओळख सुतार अशी सांगतो, श्रमिक स्वतःला मजूर घोषित करतो. हे सर्व  आपापल्या क्षेत्रातले कुशल कारागीर असतात. सराव सातत्यानं त्यांनी जे प्राविण्य संपादन केलेलं  असते ते सहजसाध्य नसतं. उदा. पोलवर चढून लाईनमन जे काम चुटकीसरशी करू शकतो ते  executive engineer  करू शकेल? असो.

एकोणीसाव्या शतकातील जुने सर्व संशोधक आणि विचारवंत यांनी त्या त्या क्षेत्रातील पदवी घेतली होती काय? बहिणाबाईने कवितांची कुठे ट्युशन लावली होती की काय? कवी लेखक होण्यासाठी कोणती अकॅडेमिक क्वालिफिकेशन हवं असते....की अमुक  शैक्षणिक पात्रता अनिवार्य असते? या सगळ्यांचा त्या क्षेत्रातील पदवी  अथवा डॉक्टरेटशी सुतराम संबंध नाही.

work  only servives not the certificate ! एखादा MBBS पदवीप्राप्त डॉक्टर प्रक्टिस करण्यात गुंग होतो...इतका की नव्या ज्ञानाचा ओघ बंद होतो. निव्वळ पाटी  लावण्यापुरती डिग्री असते बाकी  inactive ...याउलट एखादा ज्ञानपिपासू विनापदवी  त्या उपरोक्त डॉक्टर पेक्षाही अधिक  ज्ञान संपादू शकतो. कारण knowledge is  open to everybody ! खरी उर्जा जिज्ञासू निर्माण करत असतात.  हे सूत्र ध्यानात घ्या...याच न्यायाने मी स्वयंघोषित तत्वज्ञ आहे.

चित्र काढू शकणाऱ्या ला लोक चित्रकार म्हणतात. स्वयंपाक करू शकणाऱ्या व्यक्तीला आचारी हे नामाभिदान आहे. फोटो काढणारा तो फोटोग्राफर ..अशी ओळख सांगण्यात गैर ते काय? त्यांचेजवळ academik certificate भलेही नसेल तरी लोकमान्यता त्यांनी पुरेपूर मिळवलेली असते. ती त्यांच्या ओळखीला आणि कार्य पुढे चालू ठेवण्याला  पूरक ठरणारी बाब असते. कारागीराजावालील कौशल्य/कुशलता कधी परंपरेने कधी वडिलोपार्जित  कधी वहिवाटदारीने आलेली तर कधी अभ्यासाने म्हणजे सातत्यपूर्ण सरावाने मिळवलेली असते. पात्रता प्रमाणपत्र कधी असते कधी नसते तर  (कधी तो ते गरजेनुसार प्राप्तही करत असतो.) पण त्यामुळे त्याची जनमानसातील ओळख पुसल्या जात नाही. असंय तर मग आता मला सांगा मंडळी, मी स्वतःला स्वयंघोषित तत्वज्ञ का म्हणवून घेऊ नये ? मी जर रात्रंदिवस तत्वांशीच खेळतोय...तर मी स्वतःला तत्वज्ञानाच्या क्षेत्रातील  कुशल कसबी कारागीर....आय मीन तत्वज्ञ नक्कीच आहे !

झोप, श्वास, हवा , पाणी, विचार करण्याचं  स्वातंत्र्य , इ. मूळ नैसर्गिक तत्व फुकट असते. आणि टिकावू ते तग धरते  त्याच धर्तीवर मला असं वाटतंय की तत्वज्ञ जर खरा अस्सल असेल तर त्याची तत्व असं प्रकाश पाडतील  की ती लोकाना उचलून धरावी लागतील...दखल  घ्यावी लागेल जगभरातील विद्यापीठांना !! 

२२ मार्च २०२०  रोजी कोरोना ने जगाल मुलापासून हादरवून सोडलं ..तत्व, वचने, बोल-वचन, सुभाषिते यांचे अनावर आकर्षण होतं. त्यात माझ्या गरजा म्हणजे.... नित्य नव्या वातावरणाचा अनुभव घेत म्हणजे निसर्ग वातावरणात बदल साधत  राहणे , घोळका,गोतावळा, जमावात वावरणे,समारंभात मश्गुल,  बांधिलकी विरहित स्वतंत्र, आनंदी, स्वावलंबी, निचंत जगणे, शांती-तृप्ती,प्रीती peace, समाधान, प्रेम यांनी घराबाहेर मन रमवणाऱ्या जागी विचरण करणे इ. आणि याच मुक्त-विमुक्त विचारांवर घाला घातला गेला... कोरोनाने जणु.... कोरोना आधीचं  जग आणि कोरोना नंतरचं  जग अशी काळाची दोन शकले झालीत. स्वार्थाला चिकटून बसलेल्या विचाराला चालना मिळाली ...आटोपशीर बोचकीची संकल्पना दृढ झाली. 

रोग,अपघात, हार्टफेल, नैराश्य कधीही होऊ शकते हे आधीही माहित होतं...नाही असं नाही  आता भरीस भर कोरोनाने एक प्रश्नचिन्ह पुढ्यात उभं  केलं की - आता उर्वरीत  आयुष्य कसं पार पाडायचं ? आणि त्याच विचारांनी मला तत्वज्ञ बनवलं ....भांबावलेलं मन त्यामुळे शांत झालं !

आदाशा शमी विघ्नेशाच्या कृपेने झालेला मी नवश्या ! करवा चौथ या पुण्यदिवशी, अश्विन कृष्ण चतुर्थीला चंद्रोदयाला कृतिका नक्षत्र तृतीय चरणात माझा जन्म झाला.

सकारात्मकतेचे सशक्त बीज 

“विशुद्ध आचरण हीच माझी मोठी पुंजी !” असं मी किती अभिमानानी म्हणतो ! माझ्या आत चांगुलपणाचं एक सशक्त बीज  अंतर्यामी वास करीत असल्याचं सतत जाणवतं. त्याशिवायच काय इतक्या विपरीत आणि प्रतिकूल वातावरणात चांगल्या मार्गावर मी तग धरून राहिलोय?

सदाचारी माणसं...सभोवताल सौजन्य आणि सौहार्द्रपूर्ण वातवर, संपन्न सजावट, सुमधुर व्यंजने, सुवासिक फुलं...असं सगळं काही चांगलं चुंगलं अहर्निश लाभावं...ही मनीची इच्छा ! जगत पाप, क्रूरता  असणार. दरोडे दरोडा घालणार. माझ्या पुढ्यात ते नसावे...चांगुलपणाशी माझा संपर्क पळभरही तुटू नये इतकीच इच्छा वाढत्या वयात उरलीये.

समकालीन प्रभावशाली साहित्यिकात समावेश एकवेळ न होऊ देत...परंतु उल्लेखनीय योगदानाबद्दल किमान स्वतःला कृकृत्यता वाटावी...बाकी माझ्या वाट्याचे आणि कुवतीचे तेव्हढेच मला मिळणार...नियतीचा हा न्याय मला मान्य आहे. 
जरा कुठे जगावेगळे लोकविलक्षण दिसलं की मन तिकडे वेध घेतं. उदा. गाढवाशी बोलणारा माणूस, सिनेमाचे पोस्टर कसे चढवतात असे खूप सारे प्रसंग, हकीकती, किस्से, गमती कुणालातरी  सांगण्यासाठी सारख्या माझ्या पोटात उड्या मारत असतात. राहवेना म्हणून लेखनाकडे वळलो. यात प्रामुख्याने प्रसंगलीला(situation) लोकलीला (behavior) सृष्टीलीला(nature) आणि काळलीला(according to time) असतात.

संवेदनशील माणूस क्षुल्लक बाबही गांभीर्याने घेतो. त्यांचे १०० watt चा बल्ब सदनकादा  धडधड  जळत असतो. फायर ची वाट बघत नेम लावून बसणाऱ्या सैनिकांसारखी त्याची अवस्था असते. परिणामी ताण, एसिडीटी याने तो लवकर थकतो. अतिरिक्त acidity च्या बदल्यात उत्साह विकत घेऊन काम करतो. याला counter करण्यासाठी हा सकारात्म मार्ग आपसूकच निवडला गेला.

मला कशाप्रकारचे वाचायला आवडेल ते ठरवून तसं लिहू लागलं तर्जे लिहू ते स्वतःचं  स्वतःला आवडणारं  असणारच की नाही. त्यालाच आपण धाटणी म्हणतो. इवलसं  प्रबोधन बराचसा शौक अशा स्वान्तसुखाय कथा-कविता आकारात गेल्या.

बहुप्रसव वृत्तीने एकदा प्रकाशित साहित्य पुन्हा देण्याची इच्छा नसे. नवनवीन झरे आणि धुमारे. पुनरुक्तीचा दोषही प्रतिभेची विहीर आटल्याचे आणि त्यात विस्मरणाची माती पडत असल्याचे  द्योतक आहे. लेखन यज्ञात प्रकाशनाची आहुती पडत गेली तर यज्ञ धगधगत राहतो. हवी ती स्थिती हुडकताना प्राप्त स्थितीत अनुभवाचं  नाविन्य वेचणे ही कला आहे.

तत्वज्ञ जागृतीचा - गायक स्वप्नीचा 

खरं सांगू? मला त्या शास्त्रीय संगीतातलं ओ का ठो काळात नाही. गम्य नाही. रागदारी आणि सुरावटीतही गम्य नाही. पण जेव्हा  कुणी अस्सल कलाकार जेव्हा कला सादर करू लागतो...ताण सोडतो...आलाप घेतो त्या जादूने मी भारावून जातो...हमखास उर भरून येतो...नकळत डोळ्यांना धारा लागतात....गळा रुंध होतो..असं का होतं? हे पूर्वजन्मीचं नातं असावं गाण्याशी... स्वप्नातला टाळ्या घेणारा मी एक मोठ्ठा गायक आहे.
कधी निवांत मन प्रफुल्लीत झालं की गाऊ लागतं...कधी बसणे जाताना गाण्याची तंद्री लागते...तेव्हा मी गायक असण्याचे स्वप्न बघू लागतो. त्यानेही मनाला एक संतोष मिळतो हा शोध लागला...आणि हे स्वप्न पुन्हा पुन्हा बघण्यात  मौज वाटू लागली. माझी गायकी मला तोषवीते इतकं पुरेसं नाही काय?
चित्रकला आणि गायन यात श्रेष्ठ काय? हा कठीण प्रश्न आहे..पण माझ्यापुरतं उत्तर गायन हेच आहे.
नाट्यगीते, भावगीते भाव-विभोर करतात. उदा.कसं ग विसरू तो सोहळा, काशिमी त्यजू पदाला, डे हाता शरणागता, येणार नाथ आज इ.

चांदोबाचे मंतरलेले दिवस

चांदोबाचे चित्रकार के.सी. शिवशंकरन यांचं नुकतंच वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झालं. ही बातमी वाचताच त्यांची विविध चित्रं डोळ्यापुढे येवू लागली. लहान बालके, आई, व्यापारी, राजा, म्हातारी असे कितीतरी भाव अगदी तंतोतंत रेखाटणारे हे चित्रकार एक महान कलावंत होते. त्यांना भावपूर्ण आदरांजली मनोमन अर्पण करताना चांदोबाच्या आठवणींचा मनात कल्लोळ सुरु झाला.

नागपुरातील माझं बालपण ज्या मोजक्या गोष्टीमध्ये गुंतलं होतं त्यात अग्रगण्य नाव म्हणजे चांदोबा ! दर महिन्यात पहिल्या आठवड्यात धरमपेठेतल्या विदर्भ बुक डेपोत चांदोबा विकत घ्यायला हातात सव्वा रुपये घेऊन धडपडत जाणे हा जीवनातला एक मोठा आनंद होता. मला येताना बघून बुक डेपो चे मालक चांदोबा पुढ्यात काढून ठेवत ! चांदोबा हातात पडला की ऑस्कर आणि नोबेल दोन्ही एकत्रित मिळाल्याचा आनंद होत असे ! पैसे देवून चांदोबा मालकी हक्काने हस्तगत करण्याचा तो आनंद आजवर पुन्हा कोणत्याच खरेदीतून मिळाला नाहीये.
एकूण चौदा भारतीय भाषांमध्ये चांदोबा निघायचा. हिंदी आणि इंग्रजी आवृत्तीत चंदामामा असे नाव होते. मराठीत असलेली गोष्ट हिंदीमध्ये किंवा इंग्रजीत वाचायची एक मौज होती. तेव्हा अनेकांनी चांदोबाचे जुने अंक अक्षरशः एकेका वर्षाचे संग्रह बाइंडिंग करून ठेवले होते. राजविलास टॉकीज आणि पटवर्धन शाळा येथे जुन्या पुस्तकांचा बाजार भरत असे तेथे जुने चांदोबा गठ्याने ठेवलेले दिसत..... ते किलोच्या भावाने मिळत ती एक आनंद पर्वणीच होती. तेव्हा साहित्य अकादमी आणि ज्ञानपीठ पुरस्कार एकत्रित मिळाल्याचा आनंद होत असे !
चांदोबाचे एकूण स्वरूपच मोठं विलोभनीय होतं. आकर्षक रंगीत मुखपृष्ठ प्रत्येक पानावर सुबक चौकोनी चित्रकारा कडून काढलेले रंगीत चित्र. त्यात पंचतंत्र आणि आणि रामायण महाभारत धार्मिक धारावाहींक कथा फारच रंजक असत. प्रारंभी एक अद्भुत कादंबरी माया सरोवर अनेक वर्षे पर्यंत चालल्याचे आठवते. तेव्हा जादू या शब्दाची जादू विलक्षण होती. चांदोबात जाहिरात केवळ मलपृष्ठावर असायची पण आत मध्ये जाहिरातींचा शिरकाव अजिबात नसे. त्यात चित्र आणि गोष्ट वाचण्यात आम्ही इतके रममाण झालेले असू की कधीच लेखकांचं नाव वाचल्याचं स्मरत नाही. चांदोबा मध्ये कधीही साहित्य पाठवण्याबद्दल संपादकांनी आवाहन केल्याचे आठवत नाही.
माझी चांदोबाची आवड बघून एकदा एप्रिल-फूल ला कुणीतरी चांदोबा आता लवकरच बंद होणार अशी हूल उठवली होती तेव्हा अस्मादिकांना जो जबर धक्का बसला होता त्यातून मी दीर्घकाळ सावरलो नाही. बालमानावरील ते चांदोबाचं गारुड असं विलक्षण होतं.
वर्षानुवर्षे चांदोबाच्या मूळ स्वरूपात फारसा बदल झाला नाही इतकी त्याची रचना ठराविक आखीव होती. चांदोबा ची सुरुवात सुविचारी सुभाषित पासून होत असे. चांदोबाचे संपादक मंडळ फार कुशल असावे कारण त्यात कधीच मुद्रण दोष आढळला नाही. चांदोबा सोबत चंपक,नंदन, गुडिया,किशोर, कुमार, अमृत इत्यादी बाल मासिके होती पण सर्वात चांदोबा ही प्रथम पसंती होती. चांदोबा वाचत वाचत आम्ही कधी लहानाचे मोठे झालो ते कळलच नाही ! चांदोबा अजूनही निघत असावा... चांदोबाला मनापासून शुभेच्छा !!

गीताप्रेस आणि ताजमहाल

आयुष्यात एकवेळ ताजमहाल बघायला राहून गेलं तरी चालेल पण गीताप्रेस गोरखपूर बघायचीय. गीताप्रेस एक सांस्कृतिक धरोहर आहे. बालपणापासून अनेक धार्मिक पुस्तक पुस्तिकेच्या मागील पानावर त्यांच्या अन्य साहित्याची माहिती जी बघत आलोय, ते काव्य मनावर कोरलंय हो !

सातत्याने सकारात्मक विचारांच्या योगदानासाठी  गीताप्रेस गोरखपूर या प्रकाशन संस्थेची प्रतिष्ठित गांधी शांतता पुरस्कारासाठी झालेली निवड ही न्याय्य आहे. या अनुषंगाने ६ जुलै च्या मागोवा पुरवणीत प्रकाशित लेख दिशादर्शक आहे. सहज प्रश्न उद्भवला की  धर्मध्वजा  अथकपणे फडकवणाऱ्या गीताप्रेस गोरखपूर  या प्रकाशन संस्थेची नव्या पिढीला किती माहिती असेल ?


शंभर वर्षाची ही संस्था सातत्याने हिंदू धर्म ग्रंथांचे प्रकाशन करीत आहे. हा समस्त हिंदूंसाठी अभिमानाचा विषय आहे. खूप जुनी धार्मिक पुस्तके बघता त्यात  दोन नावे हमखास असायची.  केशव भिकाजी ढवळे आणि दुसरे गीताप्रेस गोरखपूर. चित्रकरांनी काढलेले धार्मिक व्यक्तिरेखांची चित्रं सुद्धा गीताप्रेस प्रकाशित करीत असे तेही चित्रावर किंवा खाली सुंदर ओळी लिहून !  कोणत्याही मंदिरातीलपुस्तक विक्रीच्या ठिकाणी गीताप्रेसची पुस्तके अगदी लहान पुस्तिका ते जाडजूड ग्रंथराज या स्वरूपात बघितल्याचे अनेकां ज्येष्ठांच्या स्मरणात असेल. अजूनही सदर पुस्तकांचे नव्या स्वरूपातील पुनर्मुद्रण उपलब्ध आहे.


दणकट कापडी वेष्टन यामुळे गीताप्रेसचे ग्रंथराज दुरूनच ओळखू येत. मोठ्या ग्रंथाची मजबूत कापडी बांधणी बघून तेथे पुस्तक बांधणी विभाग किती मोठा असेल याची कल्पना येते. पुस्तकावर एक तळटीप दिसायची. यह कागज भारत सरकारसे रीयायाती दर  से प्राप्त हुवा है असे आवर्जून  नमूद केलेले असायचे.पूर्वी गीताप्रेसची हिंदी ही प्रमुख भाषा असली तरी कालांतराने पुस्तके विविध भाषेत येताना दिसू लागली.गीता, रामायण याखेरीज काही मान्यवर स्थानिक संतांचे साहित्यही गीताप्रेस प्रकाशित करू लागली. या संदर्भात गीताप्रेस प्रकाशित दासबोधाचा उल्लेख करावासा वाटतो. सदर पुस्तके आधुनिक तंत्राचा वापर करताना गीताप्रेसच्या  कार्यक्षेत्राची व्याप्ती दिवसागणिक वर्धिष्णू होताना आढळून येते. यावरून वेळोवेळी येथे नियोजनबद्ध आधुनिकीकरण होत आल्याचे स्पष्ट होते.


गीताप्रेस गोरखपूर हे फारच भारदस्त नाव. येथून कल्याण नामक मासिक प्रकाशित होत असून ते घरी येणे हा अभिमानाचा विषय होता. त्यात मान्यवरांची हजेरी लेखनात असायची. तसेच अनेक ठिकाणी त्यातील माहिती ही अधिकृत शास्त्रसंमत संदर्भ गणली  जात असे.कल्याण मासिकाचे अंक तत्कालीन अनेक व्यासंगी लोकांनी निष्ठेने क्रमवार जतन केले होते. 


गीताप्रेसची  सर्वात उल्लेखनीय विशेषता अशी की येथील मुद्रित-शोधन प्रक्रिया अतिशय बारकाईने केल्या जात असे. परिणामी संपूर्ण ग्रंथात अजिबात चूक शोधूनही सापडत नसे. हे परमार्थ कार्य  समजून तळमळीने केले जात असावे. प्रामाणिक कटीबद्धतेखेरीज हे कसे शक्य आहे ?


गीताप्रेसच्या ग्रंथांचे लेखक अनेक असले तरी प्रामुख्याने श्री जयदयालजी गोएंदका, श्री स्वामी रामसुखदास, हनुमानप्रसाद पोद्दार ही नवे अग्रस्थानी होती.. हे सर्व तपस्वी वृत्तीचे असून महान भक्त असल्याचे त्यांची एकूण तळमळ बघून जाणवते. त्यांची छायाचित्रे कुठेही नसत इतके ते प्रसिद्धी पराग्मुख होते. ते नेमके दिसायला कसे असावेत हे कुतूहल शेवटपर्यंत शमले नाही. इतकी पुरातन संस्था डबघाईस आल्याचे वृत्त दरम्यानच्या काळात ऐकून सश्रद्ध लोकांच्या काळजाचे पाणी झाले होते. पण या वृत्तात काही तथ्य नसल्याचे वाचून जीव भांड्यात पडला.


मोठ्या शहरात गीताप्रेस्ची दुकाने असली तरी लहान गावातही अनेक धार्मिक व्यापारी आपल्या दुकानात एका बाजूला गीताप्रेस्चे साहित्य विक्रीस ठेवण्याचे धर्मकार्य करीत असत. अशाच एका ठिकाणी मी एकदा पुस्तक विकत घेण्यासठी गेलो. पुस्तक थोडे मोडले असल्याने मी दुसरी प्रत मागितली. तेव्हा ते सज्जन व्यापारी म्हणाले.

“महाशय, पुस्तकांची वाहतूक होताना  धक्का लागून असं होऊ शकते…वाचताना  काही त्रास होणर नाही…आणि हे पुस्तकही लोकांपर्यंत पोह्चावयास हवे…आणि आपल्या सारख्या भाविका खेरीज अन्य कोण ही पुस्तके विकत घ्यायला येणार ? आपण नाही घेतले तर हे पुस्तक तुमच्या सारख्याच एखाद्या अन्य भाविकाला विकावे लागणार ?  ते तुम्हाला चालेल काय ?” त्यांच्या या प्रश्नाने विचार विवश करून सोडले आणि मी नवीन प्रतीचा आग्रह सोडून तेच पुस्तक विकत घेतले.असो.


 हरेक पुस्तकाच्या मलपृष्ठावर गीताप्रेसच्या  अन्य पुस्तकांची यादी असे. याखेरीज संपूर्ण विस्तृत यादी मिळावी या हेतूने मी गीताप्रेसला पोस्ट-कार्ड टाकलं. लगेच उलट टपाली मला पुस्तकांची छापील समग्र-सूची पाठविण्यात आली. सोबत एक पत्र होतं. त्या पत्राची सुरुवात होती. सादर  हरी-स्मरण ! आणि शेवटचे शब्द होते - शेष हरीनाम ! पत्राला उत्तर देणारे ते महानुभाव आताच्या काळात निव्वळ कल्पनातीत आहेत.


गीताप्रेस गोरखपूर हा समस्त भारतीयांचा एक सांस्कृतिक ठेवा आहे. एक दैदिप्यमान वारसा आहे. भलेही एकवेळ ताज-महाल बघायचे राहून गेले तरी चालेल…पण गीताप्रेसची  अवश्य भेट घ्यायला हवी  !



भोजनम सत्यशोधनम
आज कधी नव्हे तो पाककलेशी दोन हात करण्याचा प्रसंग गुदरला ...मैने तो हथियार डाल दिये भाई....अपने बस का खेल नही !! पाककलेशी आजवर माझा संबंध नेहमीच शेवटच्या चरणात आला आहे..... म्हणजे गिळण्या पुरता ! त्यामुळे या क्षेत्रात सिद्धी आणि प्रसिद्धीशी देणेघेणे नाही ...हे ही ओघाने आलेच ! फार पूर्वी एकदा मित्रसमुहात क्रमवारीने पाकसिद्धीचा नंबर माझ्या कडे आला होता तेव्हा ....आप अगर चूपचाप खानेको तय्यार है तभी मै बनाता ! असं स्पष्ट केलं होतं त्यामुळे कुणी बोलू शकले नाही पण पुन्हा कुणी रिस्क घेतली नाही.... जान बची लाखो पाये !! म्हणले असावेत,असो. यावरून विनोबा आठवले....एकदा चर्चेत विषय निघाला.. सर्वात मोठी कला कोणती ? कुणी म्हणाले संगीत कुणी चित्रकला वगैरे.... पण विनोबा उत्तरले... पाककला !! कुणी काही म्हणो.... पण मी तरी .....विनोबांशी पूर्ण सहमत आहे मित्रांनो !!

गर गर फिरे भोवरा

भोवरा हा किशोरवयीन रंजक खेळ असायचा.... हल्ली नव्या पिढीतून जवळजवळ बाद झालाय ! महागडी साधने लागणाऱ्या खेळापासून आमचं बालपण तसं दूर...त्यामुळे भोवरा आणि तत्सम खेळांशी जवळीक अधिक, हे ओघानं आलंच !
किराण्याच्या दुकानातही तारेच्या शिंक्यात भोवरे ठेवलेले दिसायचे... गोलाकार... लांबुळके काही लठ्ठ... काही रोडके आणि शेजारी जाळीचं बंडल भोवऱ्याच्या आकारमानाने मोजून जाळी मिळे. भोवरा हवेत उडवून वरचेवर तळहातावर फिरवणे हा अफलातून प्रकार... विशिष्ट आरु असणे हा पण एक चिकित्सक संशोधनाचा विषय होता. अपुचीकीबम.... असं या परिपूर्ण खेळाचं नाव आठवतय कुणाला? यात जितके गडी असतील सर्वांनी एक दोन तीन म्हणताच एकाच वेळी जाळी गुंडाळून भोवरा फिरवायचा...ज्याची गती जास्त वेळ टिकली तो भोज्या जिंकला...त्याच्यावर डाव.. मग एक गोल करून तेथे मध्यभागी एकत्रित गोलाकार भोवरे ठेवायचे....भोज्या त्याला भोवऱ्याने मारून उधळायचा...लगेच सारे चपळाईने आपल्या भोवऱ्याला जाळी गुंडाळून जमिनीवर फिरवून ... फिरता भोवरा जाळीने उचलून अपू म्हणायचे ! ही चपळाई ज्याला साधली नाही त्याच्या भोवऱ्याला सर्वांचा एक गुच्चू.....गुच्चू म्हणजे भोवऱ्याच्या टोकाने केलेला प्रहार....असे गुच्चू जमा करून त्याचा स्वतंत्र हिशेब ठेवण्यात येई. कुणाचा भोवरा चांगला दिसल्यास सौदेबाजी होत असे. बच्चू ऐवजी भोवरा हस्तगत करण्याचा प्रस्ताव मांडला जाई. त्यावरून मान आणि अवहेलना केली जाई. कुणाजवळ किती भोवरे हा चर्चेचा विषय असे नंतर निवांतपणे गुच्चू मारण्याचा कार्यक्रम होई. गुच्चू मारण्यासाठी पटाशीची आरु असलेल्या ठेवणीतल्या भोवऱ्याची योजना...गुच्चू सुलभ व्हावे म्हणून तो पाण्यात बुडवून तेवढ्या वेळात पटाशीला घासून धार करण्यात येई. यावेळी काहींच्या चेहऱ्यावर कसायाचे तर काहींच्या चेहऱ्यावर बकऱ्याचे भाव असत..... गुच्चूचा अर्थ भोवरा फुटेपर्यंत त्याचे छिलके काढायचे. यावेळी डोळ्यात पाणी आले तरी कोणाचे हृदय द्रवत नसे.यावेळी माणसातील हिंस्र प्रवृत्ती उफाळून येई. असा यात काहीसा हिंसक भाग होता. पण परस्परांवर कुर्घुडी करणे...बळी तो कान पिळी ही जाणीव होणे...अशी स्पर्धात्मक बाजू या खेळाला निश्चित होती. हा खेळ दोघात खेळायचा झाल्यास, जिंकणाऱ्याने दुसऱ्याच्या भोवऱ्याला भोवऱ्याने मारत मारत पुढेपुढे जायचे. जेथे नेम चुकला तेथे दुसऱ्यावर डाव. हल्ली हा खेळ इतिहासजमा झालाय म्हणून हा उजाळा !नव्या पिढीला या खेळाची माहिती होण्यासाठी हे विस्तारानं लिहिलं. हा गल्लीतला खेळ गल्लीतच राहिला.

दुध वार फुटिंगवर

पूर्वी अर्ली मॉर्निंग सर्वात पहिले जनसंपर्क अभियान आणि ताजे मौखिक समाचारपत्र म्हणजे दूध केंद्र..... तेथे दिवसभर पुरणारी उणीदुणी हमरीतुमरी होई... ( सकाळचा फ्रेश उत्साह त्याला कारणीभूत होता हे वेगळे सांगायची गरज नाही ) अनेकदा खुमखुमी चे सेटलमेंट पण होत असे.. पण ती दूध योजना लिहिलेली पिवळी गाडी येताना दिसली की एकच गोड पळापळ.... आणि मग सर्व शांत शांत !
सीलबंद काचेच्या बाटलीतुन दूध..... पुरवठा कार्ड ( सहीशिक्का नोंदणी कार्डक्रमांक सहित) नुसार नमूद असलेले दूध मिळे... रांगेत नंबर लावायचा तर धडपडत अतीपहाटे उठणे क्रमप्राप्त ! तेव्हा हरेकाकडे बाटलीच्या आकाराची एक छोटी पिशवी असे.. तिच्यात दुधाची बाटली घेऊन बऱ्याच वेळाने बाबा विजयी मुद्रेने येत आणि तेथील अटीतटी चे रोमहर्षक युद्धप्रसंग साभिनय ऐकवीत.
बाटलीचा तोंडाचे कवच काढून आतील मलाई चाटण्याचा अग्रहक्क बजावण्यासाठी आम्ही शिकस्त पणाला लावत असू.... दररोज रिन्यू होणारी दूध केंद्रावर ची ओळख पुढे अनेक प्रसंग करून तारून नेताना पुरून ऊरे !
कधी दुधाची कमतरता असल्यास वेगळ्या झाकण्याचे tond दूध कमी किमतीत देण्याचा प्रामाणिकपणा आठवून आजही ऊर भरून येतो. एकदा का ती सकाळची दुध बाटली मिस झाली तर मात्र दिवसभर दुधाचा थेंब मिळणे दुरापास्त...... दुधाचा विषय हा असा वार फुटींगवर होता !!
आता काय दुग्धक्रांती झाली.... हवे तेवढे दूध उपलब्ध..... दूध नासतही आणि पाणी ओतले तरी पातळ होत नाही....रोज करा कोजागिरी.... पण त्या क्रांतिकारक सकाळची रया गेली गड्या ! गेले ते दिवस.... राहिल्या त्या आठवणी !

एकुलती घटना - युनिक इव्हेंट






दैव-शरण्तेचा सेफ्टी वोल्व

अंगात त्राण कमी त्यामुळे मध्येच दैवावर सोपवून मोकळे होण्याचा स्वभाव. पण त्राण  नाही म्हणून पीस-वर्क केले पण मोठी महत्वाकांक्षा सोडली नाही. महत्वाकांक्षा धरायची आणि दैव्वावर सोपवून द्यायची याचा मला फायदा असा झाला, की देवाला धावून यावे लागे. याअर्थी दैव-शरण्ता हा तणावावर लागलेला एक शोध होता.

१९६५ ते ७० या काळातील पिढी क्रांतीची साक्षीदार याअर्थी भाग्यवान. भलेही स्वातंत्र्य संग्राम नाही पहिला. पण लहानपणी सास्कारी जुने वातावरण आणि उमेदिपासून इंटरनेट गुगल इ. अनेक क्रांती पहिली.

अवलोकनासाठी पोषक स्थिती

अवघे बालपण जेथे पार पडले. तेथील घराच्या मागच्या रांगेत स्लम झोपडपट्टी,रस्त्यावर सांडपाणी, दोरीवर लक्तरे... सतत भांडणे आणि अर्वाच्य शिवीगाळ पण पुढच्या रांगेत उच्चभ्रू लोकांची वस्ती. तेथे अंगणी फुलबाग, खिडकीत फुलांच्या कुंड्या, पाळण्यावर झुलणारे स्वच्छ नेटके शुभ्र वस्त्रे परिधान केलेले  वृध्द,  रेडीओवर मधुर गाणी, सर्वांच्या चेहऱ्यावर शांत प्रसन्न भाव, आतून खाद्यान्नाचा दरवळ, झाडावर चिमण्या, रावे...दारापुढे बाईक गाड्या वगैरे वगैरे.हा भेद का...हा विचार सारखा मनात येई...पर्यायानं आपल्याला कसं  जीवन हवं  आहे? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी चांगला अभ्यास आपसूकच झाला.
 
सिंहावलोकनाची खोड

निवांतपणाच्या  माझ्या परिभाषेत सिंहावलोकनाचं स्थान फार वरचं आहे. निवांतपणाची जाणीव सुरु होताच, गतकाळाची रीळ उलगडणे सुरु झालंच  समजा. अर्थात त्यातसुखद  भविष्याचा ओझरता आढावाही अनुस्यूत असतो. पण दिवस कसे कसे येत गेले...आणि कसे कसे पार पडत गेले...याचे अवलोकन फार महत्वाचं वाटते. कोणत्या टप्प्यावर काय निर्णय ...आणि अंती काय निर्णायक ठरलं ...यात अदृश्य नियतीचा हात किती...माझ्या प्रयत्नाचा वाटा किती? या सर्वांचा ताळेबंद जुळवणे ...याचं निवांतपणाशी घनिष्ठ नातं आहे. 

गतकाळातील काही आठवणी पुन्हापुन्हा उगालाव्या वाटतात तर काही विसरून  जायला हव्या असतात. जीवनाच्या धकाधकीतून जरा उसंत काढून...बिछ्न्यावर पाडून...आढाकडे डोळे लावून...जन्मापासून पंचवार्षिक काळाचा आढावा घेतो.कसे बदल होत गेले – तेव्हाचे वातावरण आठवणे..हा ही एक विरंगुळा. काही तद्दन टाकावू अशा क्षुल्लक स्मृती वगळून जीवनातील जे पर्व किंवा कालखंड समृध्द करून गेले अशा आठवणी या प्राजक्ताच्या झाडाखाली पसरलेल्या फुलांसारख्या असतात. तो टपटपणारा फुलांचा सडा  जसा शिस्तबद्ध नसतो. तशी ती फुलं वेचtतानाही शीस्त सांभाळता येत नाही. ती इतस्तः गोळा कराव्या अशा त्या आठवली आहेत.

सिंहावलोकन एक मचाण आहे. येथून दुर्बिणीतून भूत-भविष्य न्याहाळणे किती  उन्मादक ! जमाखर्चाच्या या ताळेबंदात जागल्याचं समाधान आहे...उपकृतांची परतफेड आहे. आयुष्याची कृतकृत्यता आहे...नात्यांची कृतार्थता आहे...एक तृप्त निश्वास आहे. 


सचीन्तावस्था मला ग्रासते तेव्हा....

संवेदनशील व्यक्तिमत्वाची दुखणी सहजगत्या सांगता येणारी नसतात. मनोकायिक बाबी उगाच त्रस्त करतात. साचीन्तावास्तेत मन वेळोवेळी कागदावर उतरवून हलके होण्याचा प्रयत्न करीत असे. अशा अनेक वह्या भरल्या...नंतर ते ओझे सांभाळून जीवनक्षणांना खीळ घालून काय लाभ? असा विचार करून एका विमनस्क सायंकाळी ते बाड नष्ट करून टाकले. त्याने फायदा असा झाला की, याच काळात माझा लेखनासाठी हात तयार झाला. उभारणे आणि मोडीत काढणे या प्रक्रियेत आतून एक मानसिक तयारी होत असते. ती ज्याची त्यालाच कळते.

कर्म सुधारणेवर भर

कर्मा रिटर्न्स....प्रतिक्षण केलेल्या कर्माचे योग्य वेळी फळ मिळते. हा विचार दृढमूल झाला. दुष्कर्मे कितीही गुप्तपणे केली, तरी स्वतःच्या अन्त्रात्म्या पासून ती तो कसं लपवील? त्याचे मन त्याला सत्याचीच ग्वाही देणार की नाही? बघा तरी, नियातीची ही योजनां किती मनोज्ञ !! निंदनीय कृत्य करणारे किती अल्पमती म्हणून मी कीव करत असे.

४८ तासांचा दिवस

सगळंच अपडेट राखायचं तर २४ तासात कसं बसवायचं? २४ तास कमी पडू नयेत यार ४८ तासांचा दिवस हा माझ्यापुरता मार्ग शोधला. अंघोळ आदी काही कामे एक दिवसाआड केल्याने वेळेचे गणित जमू लागले. टापटीप रहायला कुणाला आवडणार नाही. पण हे इतकं वेळखाऊ असते की अन्य काही करायला सवड मिळणे कठीण ! वेळ कुठे चोरायचा? पूर्वी शास्त्रज्ञ किंवा बिझी लोक दाढी-मिशा का राखायचे...राहणी अस्ताव्यस्त...हे चालायचेच...महत्वाचे काम करताना नित्यक्रम लुडबुड करतात तेव्हा उद्वेग येणे स्वाभाविक ! प्राधान्याने कामे उरकायची तर ४८ तासांचा दिवस या संकल्पनेला पर्याय नाही.

उधार असिडच्या बदल्यात काम

पोटासाठी चाकरी कारकुनाची असू देत पण पिंड लेखकाचा विचारवंताचा आहे. ही बाब अंतरातून विलक्षण समाधान देणारी आहे. यश मिलो न मिळो...जी बाब आपल्या हातची नाहीये त्याचा विचार कशाला...मोठी महत्वाकांक्षा ठेवण्यापासून मला कोण रोकणार? हा आदर्शवाद मनात सतत जागृत असे. पण प्रत्यक्षवाद  तेथवर पोहचू देईना. उदा. पाहते उठणे हा आदर्शवाद पण शरीरप्रकृती अनुकूल नसणे हा प्रत्यक्षवाद.

हुशार लोक आलास करतात म्हणून चतुर लोकांचे फावते. अनोल्खीला भेटणे, आपले मत नोंदवणे इ कामात भीड बालाग्नारे सहजप्रवृत्त होत नाहीत..त्यामुळे मी भीड चेपून भाषण देई, कविता पाठवायचे, पत्र-मैत्री करायचो. बीजपेरणी आपल्या हातात बाकी अंकुरणे हे त्याच्या हातात. जीवनाकडे बघण्याची ही नवी दृष्टी लाभली. 

 दगदग धावपळ, कमी वेळात अधिकाधिक काम करणे परिणामी अधिक शक्तीची शरीराला मागणी करणे यामुळे पोटात एसिडीटी आणि डोक्यात enxiety. परिणामी मायग्रेन आणि फटिग.
शब्दकोडे, cricket commentary अशा तात्कालिक महत्व असलेल्या बाबतीत मी उत्सुक नसे. विनयशीलता, वाक्पटूता तसेच परीक्षेत सुवाच्य अक्षर इ. आडवळणी गुणांनी छाप पाडून व्यक्तीमत्वात भर टाकण्याचा माझा आटोकाट प्रयत्न असे.

अतिविनयम धुर्त्लाक्षणम – या न्यायाने कळले की चांगल्या लोकांना त्यांना कुणी भिवून वागत असलेले आवडत नाही. वृथा संकोच, भीड, अतिविनय, लाल्घोतू वृत्ती टाळून स्थिर राहणे महत्वाचे वाटू लागले. जेव्हा केस कमजोर तेव्हा वकील आक्रमक होतात. To get pity in the eyes of  jury असा एकूण मामला याउलट केस मजबूत असेल तर हळूच आपला मुद्दा मांडून शांत बसतात. तेव्हा वेळ आणि व्यक्ती बघून धोरण भूमिकेत बदल करण्याचे यथार्थ ज्ञान याच काळात झाले.

मागची पिढी अधिक भाग्यशाली

हरेक म्हाताऱ्याला  त्याच्या उमेदीचा काळ सर्वाधिक उत्तम वाटतो. मला आधीच्या पिढीचा काळ हा निवांत जीवन याअर्थी अधिक दर्जेदार वाटतो. आमच्या उमेदीत संगणक आणि इंटरनेट मुळे  माहितीचे समूह झाले, बसल्या जागी सोयी सुविधा वाढल्या, जगाची गती एकदम वाढली आणि निवांतपण हरपले.

तेव्हा भेसळ कमी होती. हिवाळ्यात खोबरेल तेल नक्की गोठायचे, दुधाला दुधाचा गंध यायचा. लताची गाणी वगैरे एक धुंद काळ होता. वयस्क लोक सायकलवर फिरत, सहज कुणाकडे गप्पा छाटायला जाण्याची गोड पद्धत होती. स्वयंपाक घरातून विशिष्ट दरवळ येत होता. आता जीवनमूल्ये तत्वावधान  मागे पाडून चलनी नाण्याची पूजा बांधली तरी पुरेसे..असे तत्वज्ञान मूळ धरत आहे.

सुविचारांचा सांगाती

 

मानसिक जडणघडण आईकडून वारसाहक्काने मिळाली. सतत या णा त्या चिंतेच्या पारंबीला झुलत राहण्याचे प्राक्तन ! कालांतराने त्या चिंतांचे फोलपण ध्यानात येऊन हसू येई, त्याप्सून धडा घेत नव्या चिंतेपासून सोडवणूक करणे जमत नसे. विवेकीपानाने ही घालमेल लपवू शकत असे हे बरे ! सुविचार, स्फूर्तीदायी सुभाषिते यांची या काळात खूपच मदत झाली. धैर्य हा सर्वात मोठे सद्गुण असून तो नसेल तर बाकी सारे गुण व्यर्थ आहेत. मानसोपचार पुस्तकांतून व इतर थोरांच्या वचनातून स्फुतीदायी विचार मिळाले आलं. धैर्य वाढविणारे सुविचार मी वहीत मांडत गेलो. बघता बघता एक पुस्तक तयार होईल इतकी वही भरली आहे. सकारात्मक बाजू निवडत पुढे जावे...मग ते तुम्हाला कुठेही घेऊन जावो...त्याने भलेच होणार...हा सुविचार प्रबळ ठरला.


पिस-वर्कची शक्ती 


संकल्प पेक्षाही सातत्य महान आहे. दशरथ माझी या झारखंड येथील अवलियाने एकहाती पहाड तोडून रस्ता बनवला तो निव्वळ सातत्याने ! कडाडणाऱ्या विजेच्या क्षणिक लोळापेक्षा देवघरातील स्थिर नंदादीप महत्वाचा. वाघाची शक्ती नसली तरी कासवाची गती हवी. कामाच्या पूर्ततेसाठी शक्तीपेक्षा सातत्याची अधिक गरज असते. पीस-वर्क या माध्यमातून सातत्य सहज प्रभावीपणे राबविले जावू शकते असा माझा आजवरचा अनुभव आहे.


काही जगड्व्याळ कामाचे स्वरूप निव्वळ भयावह असते. पण क्रमाने, दररोज निश्चित वेळी अमुक वेळेत थोडाथोडा कार्यभार उरकला तर लवकरच भल्या मोठ्या कामालाही एक शेप म्हणजे आकार येतो. नंतर पुर्तातेकडे वेगाने वाटचाल करता येते. Any work...if you want to do it....it will be complited....whereas if you dont want...it will be pending...forever !


मोठे कठीण-कडक फर्निचर उधळी सातत्याने अल्पावधीत पार पोखरून टाकते. एखादी मोठी कंपनी मोठे उद्दिष्ट टार्गेट पूर्ण करते ती सर्वांच्या वर्षभराच्या निरंतर पीस-वर्क मुळेच ! patience & persiverance हे दोन पीस-वर्क चे आधारस्तंभ आहेत. पिस-वर्क मध्ये थकव्याला जागा नाही...  तणावाला वाव नाही...परिणामी चुका होण्याची शक्यता नगण्य ! पण कामाच्या यशस्वी पूर्ततेची हमी आहे. पीस-वर्क चे सूत्र आहे......थेंबे थेंबे तळे  साचे - हळू हळू काम सरे !!


कथा-लिखाण, साहित्यापासारा ऑनलाईन करणे, कचरा साफ करणे, कंपाईलिंग, गृपिंग करणे या काबूत आणण्यासाठी पीस-वर्कची खूपच मदत झाली. पुस्तके अनेक आहेत पण वाचणार कधी? विषय तर अनेक आहेत पण लिहिणार कधी? मुहूर्तच लागत नाही....नित्य-वाचन...नित्य-लेखन हा पीस-वर्कचाच एक प्रकार आहे.


तासनतास परिश्रम आणि रात्री जागरण मला झेपत नाही. पर्यायाने मी पीस-वर्क हा मार्ग निवडला. दररोज अमुक वेळ थोडे काम हातावेगळे करायचे. डेली बेसिस वर नित्यवाचन आणि नित्यपठण हे व्रत अखंड राबविले. जीवनात एकेकाच्या वाट्याला येणारे अद्भुत प्रसंग आणि त्यात लोकांचे वागणे हा माझ्या कुतूहलाचा विषय. परिणामी जीवनरंग आंनी जीवनशैलीच्या आकर्षणामुळे जमेल तसे वाग्मायीन उद्यम मी वेळोवेळी करत राहिलो. याचे एकमेव कारण म्हणजे...”पडले वळण – मन देहा सकळ” हेच होय.


दिवस देवाचा - रात्र राक्षसाची 


कलावंताच सर्वतोपरी जगला 


जीविका उप-जीविका

कलावंत आणि व्यक्तित्व  कलावंत सर्वश्रेष्ठ कारण तो तंद्री अनुभवतो शेवटी एक डॉक्टर काय कामावतो आयुष्यभर

याअर्थी कलाकार सर्वतोपरी जगतो (आवडीच्या कामाचा आनंद, पैसा, कीर्ती)  


कायद्याचा फायदा काय?

न कळत्या वयात कायदा हा शब्द कानी पडला....

कायद्याने मिळायला हवे...कायदा तर हवा !  कायदा नाही तर काय करणार? 

कायदा वायदा मला माहीत नाही ! 

"असं नाही चालायचं...ignorance  of  law  have no  excuse .... असे संवाद ऐकून बालमनाला सर्वप्रथम प्रश्न पडला  की.... कायदा म्हणजे काय  ? कायद्याचा फायदा काय? नंतरही वकील, खटला, कोर्ट, कायदा हे शब्द कानावर आदळत राहिले !

कायदा म्हणजे काय हो? कायद्याचा अभ्यास केलाय म्हणजे काय?

मी नंतर LL B  केलं ते professhanal आणि एडीशनल qualification असावे म्हणून प्रक्टिस साठी नव्हे. ... परीक्षेच्या प्रक्टिकल साठी केसेस गोळा करायला जाताना न्यायालयातील  एकूणच वातावरण बघून उबग आला.

न्याय  शब्दाचा एक वेगळा अर्थ कळला. जो तो आपली औपचारिकता पुरी करत आपापल्या चाकोरीतून काम पुढे ढकलीत असतात. ऑन   रेकॉर्ड आणि ऑफ रेकॉर्ड असे वेगळे व्यवहार सुरु असतात. ऑफ रेकॉर्ड सेटल झालं तर ठीक नाही तर नैलाआजाने ओंन रेकॉर्ड करावे लागते.यात कायद्याचा संबंध प्रारंभी कुठेच नसतो. असलाच तर आपण त्यात अडकू नाय्ये ही बंधने जोतो बघत असत. प्रश्न हा की कायद्याची गरज कुठे पडते?

शेवटी कागदपत्रे फायनल करताना ती कायद्याच्या कलमानुसार करण्यात येतात. तेथे कायद्याचा संदर्भ नमूद करण्यासाठी पुस्तके हुडकण्यात येतात. काग्दाबाहेरचे जे व्यवहार होतात तेथे कायदा काहीच करू शकत नाही. आपापली आसक्ती अनेकांना तेथे बांधून ठेवत असते. त्यामुळे व्यवहार टाळणे शक्य नसते. अशा या वातावरणात जीवन-रम्य असं काहीच आढळलं  नाही.

आत लिखित कायदे theoratically काटेकोर असतात  पण बाहेर practically वेगळीच प्रॅक्टिस सुरु दिसते तर मग लिखित कायदे हवेत  कशाला? नंतर कागदपत्रे documents  करताना पुस्तकातील कलमे योग्य जागी टाकण्यासाठी 


पत्र शस्त्र 

sample letters

श्रद्धांजली अभिनंदन  जिल्हाधिकारी वगैरे

मेघदूत कार्ड ची गोष्ट  पोस्टेज खरेदी हास्यास्पद पण स्मृती सुगंध जपला तो पत्रानीच

निनावी पत्राने मत कळवणे जे फोन ने साध्य  होत नाही

कबुतर ते इ-

अब्जीनंदन खुशिपत्र प्रतिक्रिया आभार तोंडी न देता ते लिहून दिले तर कायम होतात  माणूस ते पत्र जपून ठेवतो 

sample letters

श्रद्धांजली अभिनंदन  जिल्हाधिकारी वगैरे

मेघदूत कार्ड ची गोष्ट  पोस्टेज खरेदी हास्यास्पद पण स्मृती सुगंध जपला तो पत्रानीच

निनावी पत्राने मत कळवणे जे फोन ने साध्य  होत नाही 



टीटी शी अतूट नातं 

लहानपणापासून टाईम-टेबलशी माझं अतूट नातं राहिलं आहे. त्यातून पुढे आचार-संहितेकडे वळलो. वेळापत्रकात खंड पडला की ते कोलमडते हा अनुभव आल्यानं टीटी शी बांधिलकी अधिकच दृढ झाली.

लहानपणी काटेकोरपणा वेळेचे नियोजन, कामाची यादी इ. सवयी अंगभूत होत्या. पाठांतर उत्तम. भाषेशी जवळीक आणि पर्यायानं गणित शत्रू हे ओघानं आलंच...विज्ञानाचं महत्व होतं पण अभ्यास कठीण वाटे..उदा रसायनशास्त्र इक्वेशन बलान्सिंग वगैरे जमत नव्हते....असो आपण भाषा साहित्याची आवड उत्तरोत्तर वाढत गेली. कारण ती उपजत होती.


हळूहळू time table चा उबग आला. परमार्थ पुस्तके वाचून मनात विचार बदलला...वाटलं कशाला हवाय हा उपद्व्याप? जन्माला आलो तेव्हाच तर भविष्याचे वेळापत्रक म्हणजे प्रारब्ध तयार आहे की !

इतका मोठा हिशेबनीस ...time keeper वर बसलाय मग मी का पैपै चा हिशेब मांडायचा? .त्या देवानेच वेळापत्रक देवून पाठवले आहे..आपुन क्यू उसका कानून हाथ मे लेना? मग मी पुन्हा वेळ का दवडावा?

या विचारानं मी वेलाआप्त्राकातून तात्पुरता मुक्त झालो तरी...हरेक नव्या मोहिमेची सुरुवात टीटी ने होत असे...असं हे साहचर्य फार विलाक्षण  आहे. कधी वाटते..... शेवटच्या दिवशी सुद्धा कदाचित टाईम टेबल पाठ सोडेल की नाही?

कलावंतच सर्वतोपरी जगतो 

जीविका उप-जीविका

कलावंत आणि व्यक्तित्व  कलावंत सर्वश्रेष्ठ कारण तो तंद्री अनुभवतो शेवटी एक डॉक्टर काय कामावतो आयुष्यभर

याअर्थी कलाकार सर्वतोपरी जगतो (आवडीच्या कामाचा आनंद, पैसा, कीर्ती) 


धम्माल ऑटोरिक्षा !


आमचे एक मित्र श्री राम किन्हीकर स्वतःला बसफॅन म्हणवतात…. तसा मी ऑटोफॅन आहे !


हल्ली बहुतेकांकडे  कार असतेच…. किती तिची वास्तपुस्त ….त्यात सुविधा अधिक... हे सारं  मान्य केल्यावरही आटोचं एक वेगळं आकर्षण उरतंच !


हवी तेव्हा बोट करून थांबवता येणारी ही एक मस्त चीज... नेहमीच सर्वत्र कार सोबत नेता येत नाही... बस सुद्धा हरेक ठिकाणी वळू शकत नाही… टॅक्सी सुद्धा चटकन गल्लीत उपस्थित होऊ शकत नाही ... ओला उबर साठीही मोबाईल क्रिया ही करावीच लागते…त्याच्या आधीच्या काळापासून... हरेक गल्लीत कोपऱ्यावर उभा ऑटोवाला नेहमीच आकर्षित करीत आला आहे.


कुठे जाणार?  किती पैसे?  या दोनच प्रश्नाच्या उत्तरात क्षणार्धात ऑटो'चा मनोरम प्रवास सुरू होतो. हे खरं की खोटं? ऑटोवाला आपल्याकडे पाठ करून ग्राहकाला जे स्वातंत्र्य बहाल करतो ते कारमध्ये शेजारी बसून मिळत नसते !


गंतव्य स्थानी उतरताच भाडं घेऊन ऑटोवाला दिसेनासा होतो…. काही देणी घेणी मागे उरत नाहीत निव्वळ भाड्या पुरता तात्पुरता व्यवहार…. हा एक निष्काम कर्मयोगच !


छान नवाकोरा ॲटो... तरूण-आनंदी ऑटोवाला असावा आणि गावाच्या गाव मी मजेत सफर करावी असं बरेचदा वाटून जातं ! हे स्वप्न कधी पूर्ण होईल?  काळी साडी पिवळा ब्लाउज -  भटकायची तर खूपच हौस !  हे कोडं लहानपणी घालत असू…. पण अजूनही त्यातील ताजेपण ओसरलं नाहीये !



सोनेरी उन्हाचा चाहता 

हिरव्याकंच पानांतून स्त्रवणारी ती सकाळच्या कोवळ्या उन्हाची तिरीप मला खूपच भावते. निसर्गाचे ते अवखळ उत्फुल्ल शोडशी चैतन्य ! निसर्गाचं  ते शोडशी चैतन्य...आसमंतात तो पिवळाधम्म सहस्त्ररश्मी सूर्य दिसायला हवा.  मध्यान्ही तो पिवळाधम्म रविराज आगीचे लोळ ओकतो.. तेव्हा अंग शेकायला होतं...नवी झळाळी नवे तेज प्राप्त होतं..अर्थात .जुलै मधील तो उकाडा असह्य.... पण ढगाळ वातावरणात जेव्हा सूर्यदर्शन दुरापास्त होतं तेव्हा भकास आणि भयाण हे दोनच शब्द पिंगा घालू लागतात....जीव कासावीस होतो.... चैतन्य कुंठीत होतं.... छातीवर अनामिक दाब आणि दडपण येतं. अल्पावधीत ढगांना दूर सारून सूर्य डोकावला की क्षणात नैराश्य मावळते. शुध्द हवा, निरभ्र आकाश आणि सोनेरी सूर्यप्रकाश असेल तर माझ्या जीवाची बॅटरी चांगली चार्ज होते. जी कुंद हवा आणि ढगाळ वातावरणात पार डाऊन झालेली असते.

माझा जन्म ऑक्टोबर म्हणजे थंडीतला...पण थंडी मला भिवविते...सहन होत नाही..जणु रक्तवाहिन्यांना एक जडत्व येतं. लहानपणी थंडीच्या दिवसात अर्धशिशी ही पाचवीला पुजलेली असायची. सारं कसं शांत, निवांत ठरवून आणि राजेशाही थाटाने हवे...पण दैवानेही साथ द्यायला हवी !

उन्हाळा भावतो कारण तो मला मानवतो...उन्हाळा म्हणजे सन-शाईन डेज...वातावरण रम्य आणि रमणीय वाटते...समस्या त्या मानाने कमी होतात...कानाला गमछा आणि प्यायला वाळ्याचे गार पाणी मिळाले की बेतास बात...वरून लिंबू-सरबत, पन्हे, उसाचा रस..अहाहा..बाकी उन्हाळ्याची तक्रार म्हणून कशाला? एवढी माफक गरज भागली तरी पुरे ! 

उन्हाळ्यात दिवसाचा मोठा हिस्सा वाट्याला येतो ही जमेची बाजू..लवकर उजाडूनही तिन्हीसांज उशिरा होते....भसाभसा जेवण जाते...ढसाढसा पाण्याचे घोट पोटात जातात..हातपाय सटासट हलतात...सपाटून झोप लागते...याउलट शरदऋतुत जणु रक्तच गोठते...सर्दी पडशाचे ट्राफिक जाम ...मनावर मणाचे दडपण !चोरीच्या बातम्या वगळता बाकी उन्हाळ्यात सामुहिक सहली छान पार पडतात...रस्त्याची प्रलंबित कामे निघतात...

कृश शरीरयष्टी...चिंतनशील तत्वज्ञानी...विरक्त वैरागी, कलंदर छांदिष्ट असे लोक उदा.डायोजेनिस यांनाही थंडीचा त्रास होता म्हणे...म्हणून ते सोनेरी उन्हाचे चाहते होते का? यामागचे आयुर्वेद आणि विज्ञान शोधायला हवे ! कडक उन्ह ज्यांना सुखद वाटते ते तत्वज्ञांनी वृत्तीचे, छांदिष्ट, चिकित्सक, सृजनशील लेखक, कवी का असतात? त्यांचे केमिकल्स त्यांच्या बुद्धीची जादान्घादन तशी करतात का...कारण एक समान वैशिष्ट आढळते ते म्हणजे थंडीचा त्रास असणे आणि पर्यायाने सोनेरी उन्हाचे चाहते असणे !! Really sun is a great mood booster.

शांती की खोज मे 

 आनंद शांतीच्या शोधात  मी मोकळ्या माळरानावर जाऊन बसतो....तेथे पंचतत्त्व विपुल असते...जमीन...जमिनीखाली पाणी, वरून सूर्याचं  तेज, चोहीकडे वाहणारा वायू, आणि सभोवताल व्यापून असलेली पोकळी म्हणजे आकाश ! जमिनीवर झोपल्याने पृथ्वीतत्व शरीरातील सर्व रोगराई खेचून घेते. असा माझा विश्वास आहे. त्या धरित्री मायच्या मांडीवर जो विश्राम मिळतो तो अन्य कोठे मिळणार?

येस्स यू मे कॉल मी सुपरस्टीशीअस 

मी अंधश्रद्धावादी कधी झालो म्हणाल तर जन्मापासून..म्हणाल तर न कळत्या  वयापासून...कारण घरी त्याखेरीज अन्य वातावरण नव्हतेच मुळी !

माझ्या बुधीवादाच्या प्रवासाचे अडथळे  विलक्षण होते. प्राथमिक जडण-घडण धार्मिक होती.  सामाजिक आर्थिक शारीरिक मानसिक आधार तुटपुंजा असला की आधार केवळ देवाचा असतो...संकटात तोच तरुण नेणार त्यावर सारी भिस्त असते. देवाशी संधान यासाठी अन्य कुणाची गरज नसल्यानं ते सोपं असते. त्यात कर्म-सिद्धांताने मनावर विलक्षण गारूड  केलं होतं.

मी बुद्धिवादी कसा झालो ? 

माणूस वयात येतो तेव्हा जुन्या रूढी मोडून जग बदलण्याच्या बाता करतो. हेच तारुण्याचे दृश्य लक्षण असते. बर्या दिवसात माणूस छातीला मातीच्या गोष्टी हाणतो. लाथ मारून पाणी काढण्याच्या दिवसात बुद्धीवाद, वास्तववाद, प्रत्याक्षवाद, विज्ञानवाद जवळचा आणि आश्वासक वाटू लागतो. 

पुस्तकांचा परिणाम ही उल्लेखनीय बाब होय. विज्ञानवाद, आस्तिक नास्तिक, आत्मा, पुनर्जन्म या चक्रात अडकलेलं  अध्यात्म थोतांड वाटू लागलं. विज्ञान सोडून बाकी सब झूट वाटू लागलं. आदमी पिछले जनम का क्रम नही तो इस जनम  की परिस्थितीया भोगता है....या विचारांनी प्रभावित होण्याचे ते दिवस होते.

आजवर मनात जोपासलेले विचार जेव्हा खुळे वाटू लागतात ती तगमग अनाकलनीय असते. त्यामुळे नित्यनैमित्तिक स्त्रोत्रांचा विसर पडला. रोज अंघोळीची गरज भासेनाशी झाली. देवळात जाणे कालापव्यय वाटू लागला. गीताप्रेसची अनेक संग्राह्य पुस्तके वाचनालयाला देऊन टाकली, टिळा  विभूती लावणे कमी झाले.

मी पुन्हा परमार्थाची कास कशी धरली 

संकटाच्या वेळी जेव्हा मानवी मर्यादा अडवतात, प्रयत्न निष्फळ ठरतात तेव्हा मानसिक आधार केवळ सर्व-व्यापक, सर्व-शक्तिमान, सर्वान्तर्यामी परमेश्वर देऊ शकतो...याचं साक्षात्कार झाला. हाक मारली तर धावून येणारे किती? याचा आढावा घेतला तेव्हा स्वतःच्या सामर्थ्याचा फोलपणा ध्यानात आला.

आणि मी गर्वांनी म्हणू लागलो...होय तुम्ही मला खुशाल अंधश्रद्ध म्हणा....मला त्याचा अभिमानाच वाटेल. देवा हात जोडतो..खाण्या-पिण्याचे देहदमन जमायचं  नाही रे बाबा....यासाठी लावायचे ते पाप माझ्या माथी लावून मोकळा हो कसा.... अरे, जे अभक्ष्य भक्षण करतात...त्याना पापाची पर्वा नसते...भीती नसते...तर मग मला कशाला आणखी नियम हवेत?

होय, आता तुम्ही मला खुशाल अंधश्रद्ध म्हणा...मला त्याचा अभिमानाच वाटेल.


अतीसाहीष्णू हे अतिरेकीच 

शस्त्रसज्ज शत्रूला शांतीपाठ ऐकवणारे अतीसाहीष्णू हे अतिरेकीच !


HSP (health safety & personality )

look decent act decent speak decent 

जगावेगळे छंद : battery  charging  पंचतत्वात  माळरानावर पहुडणे , मजल-दरमजल गावदर्शन सदिच्छा भेट 

आटोपशीर बोचकी

बीजपेरणी सुरु ठेवावी  

माझं कुतूहल

माझे बारके शोध 

माझी खाद्ययात्रा

माझा पत्रव्यवहार 

एकांत माझं सांगाती

माझं कुतूहल, पेहेराव, व्याधी आणि खाऊगिरी

सोनेरी उन्हाचा चाहता

४८ आणि ७२ तासांचा दिवस

इस तबियत ने निकम्मा कर दिया- वारणा बाम भी आदमी थे काम के



ज्योतिष संभ्रम आणि समाधान ---ज्योतिषाचा नाद 

बालपणापासून वाचनाची पाजत गोडी...यथाकाल सर्वच थरातील विस्तृत वाचन घडत गेलं. तेराव्या वर्षापासून सुरु झालेली कलमगिरी पुढे सातत्यानं टिकून राहिली...विविध निबंधस्पर्धा, वाचनालये आणि साहित्य प्रसार केंद्राच्या वाचानस्पर्धा यात आवर्जून सहभाग नोंदवीत असे.

कालयात्रा हा कथासंग्रह प्रकाशित...यात अखंड काळाच्या विलक्षण किमयेतून उलगडणारा मनुष्यस्वभाव ..पर्यायाने विविध जीवनरंगआणि जीवनमूल्ये  यांचे मनोज्ञ चित्रण साकारण्याचा प्रयत्न केलाय ! मानवी स्वभावाची गुंतागुंत हाच या लघुकथांचा केंद्रबिंदू !! कालानुरूप बदलती जीवनमूल्ये प्रसंगी तत्त्वनिष्ठा तर कधी व्यक्तीनिष्ठा  तसेच  प्रसंगनिष्ठेच्या निकषावर घासून व्यक्त झालेले हे अभिजात सृजन लोकाभिमुख करण्याचा एक प्रयास ! याच अनुषंगाने काळ हा धागा पकडून आकारलेल्या कथांचा संग्रह म्हणजे कालयात्रा....या सर्वच कथा कल्पित, स्वरचित आणि स्वतंत्र आहेत.

चंद्रपूर सारख्या काहीशा मागास क्षेत्रात जेथे कोळसा आणि सिमेंटचे वितरण होते. तेथे पुस्तकांच्या वितरण व्यवस्थेचा अभाव आहे. अशा ठिकाणी लेखन अक्षर-जुळवणी, मुद्रित-शोधन , मुद्रण इत्यादी प्रक्रिया पार पाडणे हे एक मोठं कष्टप्रद आव्हान होतं.

 विविधस्तरीय व्याख्याने, कथाकथन, कविसंमेलने यातून सक्रीय सहभाग नभोवाणीवरून प्रातःकालीन चिंतने, शब्दलोक मधून कविता वाचन आणि कथाकथन प्रसारित.

 लेखनप्रकार : कथा, कविता, कादंबरी, ललितबंध, चिंतन, आत्मनिवेदन, व्यक्तिचित्रण, एकपात्री नाट्यछटा, प्रवासवर्णन इ. स्तंभलेखन : दै. तरुण भारतातून विषयांतर, खुसखुशीत, गुलकंद, नंदादीप, हि चिरंतनाची वाट , बोली-अबोली इ.

शिक्षण एम.कॉम. एल एल.बी.. लॉ च्या अंतिम वर्षात  शोधनिबंध : सेक्युलारीझम अंडर कांस्टीट्युशन  ऑफ  इंडिया, सदर केला. महाराष्ट्र ज्योतिष परिषदेतर्फे ज्योतिष-शास्त्री ही पडवी प्राप्त त्यात प्रबंध "वकील आणि ग्रहयोग" सदर केला.आगामी वांग्मयनिर्मितीचे अर्थशास्त्र(प्रस्तावित), विषय डॉक्टरेट साठी निवडला होता. डॉक्टरेट केल्याबिगर मारायचं नाही असा माझा एक डॉयलॉग....इतकी नावाआधी डॉ. लावण्याची हौस होती. पण मोडशी जिरली. एकदा प्रयत्न करून झालाय...पण योग दिसत नाही. शिवाय आता तो जोम आणि जोश पण संपलाय.  आता केवळ ईश्वरी कृपा....चमत्कार....एखादे आचार्य पीठ ...मानद डिलीट देऊ करेल  तरच मिळवली...नाहीतर राहिलं ...बघुया पुढील जन्मी...हाहाहा !!.

 प्रकल्प : "मराठी म्हणी - प्रतिशब्द - शब्द्व्युत्पत्ती " या समूहाचे सोशल नेट्वर्किंग संकेतस्थळावर मराठीभषा संवर्धनार्थ आयोजन.

 ट्विटर वर देशगौरव national proud, अभिनंदन प्रसारण,

 ब्लॉगवर आत्मनिवेदन लेखन, कार्यक्रम anchoring, मान्यवरांची प्रकट मुलाखत, कथास्पर्धा परीक्षण, onlineकाव्यकुसुमांजली परीक्षण इ. रुची आणि अभ्यासाचे विषय : ज्योतिष, कर्मसिद्धांत ,वंशावली, भविष्यवेध,

 पुरस्कार : २२ वे अ.भा.सावरकर साहित्य संमेलन, नागपूर...... गीता साहित्य परिषद, अकोट जि. अकोला , सृजन प्रस्तुत कलादरबार प्रथम मानकरी, भारतीय स्त्री-शक्ती अमरावती, योगाभ्यासी मंडळ नागपूर , १८५७ स्वातंत्र्य समर निबंधस्पर्धा , भारतीय सद्विचार प्रसारक मंडळ पत्रकार शिबीर , कालयात्रा ला शब्दांगण सन्मान , साहित्य प्रसार मंडळ नागपूर वाचन स्पर्धेत प्राविण्य , फिनिक्स साहित्य मंच काव्य स्पर्धा प्रथम, त्रिस्कंध ज्योतिष मंडळ नागपूर ची ज्योतिष-प्रवीण पदविका , महाराष्ट्र ज्योतिष परिषद, मुंबई ची ज्योतिष-शास्त्री पदवी प्राप्त.पद्मगंधा प्रतिष्ठानच्या वैदर्भीय सारस्वत या लेखक सूचीत समावेश, झाडीपट्टीचे शब्द्साधक या लेखक सूचीत नामांकन. अभिव्यक्ती तर्फे अक्षरक्षण हा काव्यसंग्रहाला सुलभा जकाते पुरस्कार


आपणास लहानपणी प्राप्त 'निराधार माहिती', ही 'ज्ञान' प्राप्तीमधील फार मोठी अडचन असून ही प्राप्त माहिती 'जिज्ञासे'ची शत्रु आहे!




 


एक सन्दुक पिढ्यांनी जपावी 

 

 

 



















सांगे बाबांच्या गोष्टी

बाबांचा जन्म मूळतापीचा. घराजवळ   चार पावलांवर तापीतीराचे नयनरम्य सानिध्य ! आजोबांच्या अकाली निधनाने पाठोपाठची भावंडं असणारं ते घर जणू उ...